वसमत तालुक्यातील गुंज येथे रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 08:06 PM2021-05-06T20:06:23+5:302021-05-06T20:06:51+5:30
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही लग्नसराई सुरूच आहे. वसमत तालुक्यातील गुंज या गावात बालविवाहाचे आयोजन करण्यात आले होते.
हिंगोली : वसमत तालुक्यातील मौ. गुंज येथे नांदेड जिल्ह्यातील लहुजीनगर येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह ५ मे रोजी लावून दिला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी हा विवाह रोखला.
अल्पवयीन मुलीच्या बालविवाहाबाबत जिल्हा बालसंरक्षण कक्ष, नांदेड यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी कार्यवाही केली. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही लग्नसराई सुरूच आहे. वसमत तालुक्यातील गुंज या गावात बालविवाहाचे आयोजन करण्यात आले होते.
बालविवाह होत असल्याची चाहूल लागताच जिल्हा बालसंरक्षण कक्षातील बालसंरक्षण अधिकारी गणेश मोरे, बालसंरक्षण अधिकारी जरीब खान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वा. जी. वाघमारे यांनी त्या गावातील ग्रामसेवक ए. पी. गिते, सरपंच सत्यभामा नरवाडे, पोलीस पाटील अंकुश सूर्यवंशी, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अंगणवाडीताई जया जनकवाडे यांच्या समक्ष मुलाच्या आई, वडील, मामा यांची भेट घेतली व या गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे समुपदेशन केले. संबंधितांचा ग्राम बालसंरक्षण समितीसमक्ष लेखी जबाब लिहून घेण्यात आला.