मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने संतप्त प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:32 AM2021-05-06T04:32:07+5:302021-05-06T04:32:07+5:30
काहीतरी न्यूनगंड मनात बाळगून सध्याचे सत्तेतील सरकार आणि विरोधकांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा घात केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ...
काहीतरी न्यूनगंड मनात बाळगून सध्याचे सत्तेतील सरकार आणि विरोधकांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा घात केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठ्यांनी आक्रोश करूनही आज ही हार पदरी पडली. मात्र, पुन्हा लढा उभारण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्यांचे बलिदान वाया गेले. गलिच्छ राजकारणामुळे मराठा समाजावर अन्याय झाला. मराठा समाजाबद्दल अनास्था असणाऱ्या नेत्यांनी हे घडवून आणले. हे दुर्दैवी असून याचा निषेध करतो, असे भूषण देशमुख यांनी म्हटले.
मराठा आरक्षणासाठीचा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही. गायकवाड समितीचा अहवाल पूर्ण मांडला गेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचा आरक्षणाबद्दलचा हेतू स्पष्ट होतो. त्यामुळे हा दुर्दैवी निर्णय झाला, असे मराठा क्रांती मोर्चाचे ॲड.अमोल जाधव म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेल्या निकालावरून केंद्र व राज्य सरकार याबाबत किती उदासीन आहे, हे दिसून येते. न्या.गायकवाड अहवालातील शिफारसी मान्य करून मराठा समाजाचा सरसकट राज्यात अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षण यादीत का केला जात नाही? सत्ताधारी व विरोधक दाेन्हीही समाजाला खेळवत ठेवत असून, त्याचा निषेध करते, असे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा राजश्री क्षीरसागर यांनी सांगितले.