मोठी माणसे अर्धपोटी राहू शकतात, लेकराबाळांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:05+5:302021-03-07T04:27:05+5:30
हिंगोली: पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुरांना मागील पाच दिवसांपासून काम मिळत नसल्यामुळे त्यांना अर्धपोटीच रात्र काढण्याची वेळ आली आहे. ...
हिंगोली: पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुरांना मागील पाच दिवसांपासून काम मिळत नसल्यामुळे त्यांना अर्धपोटीच रात्र काढण्याची वेळ आली आहे. मोठी माणसे अर्धपोटी राहू शकतात; पण लेकराबाळांचे काय? असा खडा सवाल मजुरांनी उपस्थित केला आहे.
मागील पंधरा-वीस दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात निघत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्च अशी सात दिवस जिल्ह्यात टाळेबंदी लागू केली आहे. शहरातील अकोला रोड, खटकाळी बायपास आदी मोकळ्या जागी पोटाची खळगी भरण्यासाठी मध्यप्रदेश तसेच विदर्भातून ५० कुटुंब हिंगोलीत दाखल झाले आहेत. मजुरी कामाबरोबर गॅस दुरुस्ती करणे, कूकर दुरुस्ती करणे, शेगड्या दुरुस्त करणे आदी कामे ही मंडळी करीत आहेत. याचबरोबर ऊस तोड आणि शेतातील कामावरही ही मजूर मंडळी जात असते. दरवर्षी कामाच्या शोधात हे मजूर हिंगोली जिल्ह्यासह आसपासच्या तालुक्यांतही वास्तव्य करून राहत आहेत.
गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने डोके वर काढले. पाच महिने तर उपाशीपोटीच रहावे लागले. त्यावेळेस जिल्हा प्रशासनाने माणसी पाच किलोप्रमाणे अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू दिल्या. जिल्हा प्रशासन काळजी घेत असले तरी कोरोना कमी होण्याचे नाव घेत नाही. परिणामी, आमच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे अर्धपोटी उपाशी राहण्याची वेळ पालामध्ये राहणाऱ्या मजुरांवर आली आहे.
काबाडकष्ट केले तरच घरात धान्य येईल
कोरोनामुळे घरात बसण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नाही म्हटले एका पालमध्ये चार सदस्य आहेत. असे जवळपास पन्नास ते साठ मजूर कुटुंब आजमितीस हिंगोली शहरात राहत आहे. मजुरीशिवाय आमच्याजवळ कोणताही पर्याय नसल्यामुळे लॉकडाऊन केले की आम्हाला व लेकराबाळांना उपाशी राहण्याशिवाय पर्यायच राहत नाही. तेव्हा जिल्हा प्रशासनाने पालांमधील मजुरांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती मजुरांनी केली आहे.
फोटो एचएनएलपी६