त्या विषारी कफ सिरपमध्ये कोणते रसायन आढळले? WHO ने दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:52 IST2025-10-09T13:51:24+5:302025-10-09T13:52:59+5:30
भारतात गेल्या काही दिवसांपासून विषारी कफ प्यायल्याने 22 मुलांचा मृत्यू झाला आहे.

त्या विषारी कफ सिरपमध्ये कोणते रसायन आढळले? WHO ने दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या...
भारतात गेल्या काही दिवसांपासून विषारी कफ सिरपमुळे 20-22 लहान मुलांचा मृत्यू झाल्याने देशातील आरोग्य क्षेत्र हादरुन गेले आहे. मृत्यू झालेल्या बहुतांश मुलांचे वय 5 वर्षांपेक्षा कमी आहे. प्राथमिक तपासात या सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकोल (DEG) नावाचे अत्यंत विषारी रसायन आढळले आहे. हे रसायन मानक मर्यादेपेक्षा सुमारे 500 पट अधिक प्रमाणात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
WHO चा इशारा
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने या प्रकरणावर सविस्तर अहवाल जारी केला आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, भारतात तयार करण्यात आलेल्या Coldrif, Respifresh आणि RELIFE या तीन सिरपमध्ये हे विषारी रसायन आढळले आहे. हे सिरप प्रामुख्याने भारतातच विकले गेले असून, त्यांचा अधिकृतपणे निर्यात केलेला पुरावा नाही. मात्र, WHO ने इशारा दिला आहे की, अनौपचारिक मार्गाने काही प्रमाणात हे सिरप विदेशात पोहोचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डायइथिलीन ग्लायकॉल (DEG) चा वापर कशासाठी होतो?
इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, औद्योगिक वापरासाठी महत्त्वाचे रसायन असलेले डायइथिलीन ग्लायकॉल (DEG) हे प्लॅस्टिक, रेजिन, ब्रेक फ्लुइड, ल्युब्रिकंट आणि कृत्रिम धूर तयार करण्यासाठी वापरले जाते. नैसर्गिक गॅसमधील ओलावा काढण्यासाठीही ते उपयोगी ठरते. मात्र हे रसायन अत्यंत विषारी असल्याने अन्न, औषधं आणि कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये याच्या वापरावर बंदी आहे.
DEG चे विषारी स्वरुप 1937 मध्ये समोर आले
तज्ज्ञांच्या मते, फक्त 1 ग्रॅम प्रति किलो शरीरवजन इतकाही डोस जीवघेणा ठरू शकतो. यकृतात जाऊन हे रसायन विषारी संयुगे तयार करते, ज्यामुळे मूत्रपिंड आणि यकृत निकामी होण्याचा धोका वाढतो. विषबाधेनंतर मळमळ, उलटी, कोमा, लकवा आणि अखेरीस मृत्यू अशी लक्षणे दिसतात. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात DEG ला केवळ 0.2 टक्क्यांपर्यंतच परवानगी आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी औद्योगिक रसायनांचा वापर काटेकोर तपासणीशिवाय औषधे किंवा सौंदर्यप्रसाधनांत न करण्याचा इशारा दिला आहे.
WHO च्या मते, या रसायनामुळे किडनी फेल्युअर, न्यूरोलॉजिकल समस्या आणि मृत्यू, यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. सध्या या विषारी रसायनाचा स्रोत शोधणे सुरू आहे.
भारतात कफ सिरपमुळे मृत्यू का झाले?
WHO आणि भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त तपासात असे समोर आले आहे की, औषधांच्या गुणवत्तेच्या तपासणी प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्या आहेत. कायद्यानुसार प्रत्येक औषधाची बॅच तपासणे बंधनकारक आहे, मात्र काही उत्पादक कंपन्यांनी या नियमांकडे कानाडोळा केला. Sresan Pharmaceutical कंपनीच्या Coldrif सिरप मध्ये DEG चे प्रमाण जास्त आढळल्यानंतर उत्पादन थांबवण्यात आले आणि फॅक्टरीही बंद करण्यात आली आहे.
Shape Pharma आणि Rednex Pharmaceuticals यांच्या Respifresh आणि RELIFE सिरपमध्येही मानक मर्यादेपेक्षा अधिक रसायन आढळले आहे. या दोन्ही कंपन्यांवर उत्पादन आणि विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका डॉक्टरसह कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करुन, पुढील तपास सुरू केला आहे.
भारतासाठी मोठा धक्का
ही घटना भारताच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का आहे. भारत जगात औषध उत्पादनाच्या क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याचा निर्यात बाजारही प्रचंड मोठा आहे. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या 40% जनरिक औषधांचा पुरवठा भारतातून होतो. तसेच आफ्रिकेतील सुमारे 90% औषधे भारतातून निर्यात होतात. अशा परिस्थितीत, या घटनेमुळे भारताच्या औषध उद्योगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोग्य मंत्रालय आणि WHO च्या सूचना
WHO आणि भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांना कफ सिरप आणि सर्दीच्या औषधांचा वापर टाळण्याचा इशारा दिला आहे. अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही नॉन-प्रिस्क्रिप्शन सिरपचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.