पावसाअभावी पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:33+5:30
पाऊस लांबल्यामुळे धाबेपवनी या आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त परिसरातील धानपिके धोक्यात आली आहेत. तर अर्ध्याहून अधिक धान पिकाची रोवणी खोळंबल्या आहेत. आता जर पाऊस आला नाही तर या परिसरातील शेतकऱ्यांना धानपिक घेण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या धानाची रोवणी झालेली आहे ते शेतकरी आपले धानपिक वाचिवण्यासाठी आटापिटा करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : जिल्ह्यात मागील महिनाभरापासून दमदार पाऊस न झाल्याने पऱ्हे आणि केलेली रोवणी सुध्दा वाळण्याच्या मार्गावर आहे. विहिरी, बोअरवेल आणि सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या मदतीने पऱ्हे व रोवणी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.एकंदरीत पावसाअभावी कोरडा दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पाऊस लांबल्यामुळे धाबेपवनी या आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त परिसरातील धानपिके धोक्यात आली आहेत. तर अर्ध्याहून अधिक धान पिकाची रोवणी खोळंबल्या आहेत. आता जर पाऊस आला नाही तर या परिसरातील शेतकऱ्यांना धानपिक घेण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या धानाची रोवणी झालेली आहे ते शेतकरी आपले धानपिक वाचिवण्यासाठी आटापिटा करीत आहेत. तर ज्यांची पावसाअभावी रोवणी झाली नाही ते रोहिणी कधी होणार या चिंतेत आहे. पाण्याची पातळी खालावल्यामुळे शेतीला विहिरी किंवा पंपाद्वारे पाणी देणे सुध्दा कठीण झाले आहे. ५ जुलैला लागलेल्या पुष्य नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे धानाची रोवणी अर्धवट आहेत. १९ जुलैला लागलेला पुनर्वसू नक्षत्र कोरडाच गेला. कान्होली, रांजीटोला, कोहलगाव, जब्बारखेडा, पवनी, तिडका, एरंडी, झाशीनागर, भसबोळन, जांभळी, येलोडी, रामपुरी,धाबेटकडी, चुटिया या आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त गावांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे.
कोरोना कालावधीत बेरोजगार झालेले हात शेतीच्या कामात गुंतले असताना पावसाने पाठ फिरविल्याने मिळालेला रोजगार हिरावला आहे. एकीकडे शेतकरी पावसाअभावी संकटात सापडला तर दुसरीकडे दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाच्या प्रतीक्षेत आकशाकडे लागल्या आहेत. मजुरांचे कामाअभावी हाल होत आहेत. दमदार पाऊस न झाल्यामुळे तलाव, बोड्या, नाले सर्व कोरडे पडले आहेत. त्यामुळे सिंचनाचा गंभीर प्रश्न या परिसरात निर्माण झाल्याचे कान्होली येथील शेतकरी महेंद्र रहिले यांनी सांगितले.
पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचा नजरा
यंदा पावसाने भरपूर ओढ दिल्याने पिकांवर ताण निर्माण झाला आहे. तर पावसाअभावी मोठ्या प्रमाणात रोवणी खोळंबली असून केलेली रोवणी सुध्दा वाळत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ४५ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना पिकांना मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा स्थिती ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्या शेतकºयांना मदत मिळणार का याकडे सुध्दा शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
सिंचन प्रकल्प पडले कोरडे
मागील पंधरा दिवसांपासून या परिसरात पाऊस झाला नाही. परिसरात सिंचनाची व्यवस्था नाही. तलाव नाही बोड्या नाही. या परिसरात दूरवरच्या बाजूला इटियाडोह धरण तर इकडे खालच्या बाजूला नवेगावबांध जलाशय आहे. या दोन्हीतून शेतीला प्रत्यक्ष सिंचन होत नाही. त्यामुळे हातातील पीक तर जाणार नाही ना? धानाची रोवणी होणार की नाही ही चिंता बळीराजाला सतावत आहे. शेतकरी आटापिटा करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
झाशीनगर उपसा सिंचन योजनेने केली निराशा
इटियाडोह धरणाचे पाणी उपसा करून परिसरात शेतीसाठी पाणी देण्याचा महत्त्वाकांक्षी झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्प राजकारणामुळे अद्यापही पूर्ण झालेला नाही. झाशीनगर उपसा सिंचन योजना मार्गी लावली जाईल असे आश्वासन अनेकांनी दिले पण हा प्रकल्प अद्यापही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका या परिसरातील शेतकºयांना बसत आहे.