खबरदार; प्रवाशांनो रेल्वे प्रवासात 'अशी' घ्या काळजी, अन्यथा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 05:00 AM2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T06:22:19+5:30
तरुण मंडळी गावाकडे जाताना प्रवासादरम्यान मौजमस्ती करतात. अचानक धोका घडल्यास कुटूबीयांचे काय, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. रेल्वे कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात जाण्याची वेळ येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या सणासुद्दीचे दिवस आहेत. दूरवरुन प्रवास करणे कुटूंबीयांच्या भेटीसाठी गावाकडे येणाऱ्यांची संख्या अधिक असते. कुटंबातील व्यक्ती येणार असून कुटूंबीय मोठी तयारी करतात. ते भेटीसाठी आसुसलेले असतात. मात्र काही वेळा प्रवासातील बेजबाबदारी जीवावर बेतते. त्यामुळे प्रवास करताना जरा सांभाळून करणे गरजेचे आहे. आनंदाच्या दिवसांमध्ये कुटूंबीयामध्ये दु:खाचा डोंगर कोसळणार नाही याची काळजी विशेषत: तरूणार्इंने घेणे आवश्यक आहे.
तरुण मंडळी गावाकडे जाताना प्रवासादरम्यान मौजमस्ती करतात. अचानक धोका घडल्यास कुटूबीयांचे काय, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. रेल्वे कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात जाण्याची वेळ येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून घेतलेले गुंगीचे खाद्यपदार्थ खाल्यामुळे एक दोन दिवस शुध्दीवरही येत नाहीत. हा निष्काळजीपणा अनेक प्रवाशांच्या जीवावर बेततो. अनेकदा उशीरा रेल्वेस्थानकावर पोहोचलेले प्रवासी धावत्या गाडीत चढण्याच्या प्रयत्न करुन थेट मूत्यूलाच आव्हाण देतात. अशा प्रकारच्या असंख्य घटना घडूनही प्रवासी त्याबाबत कुठलीही सावधानता बाळगतांना दिसत नाहीत. याबाबत जागृत करुनही प्रवासी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. या घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.
चालत्या गाडीत चढणे-उतरणे टाळा
चालत्या गाडीत चढणे, उतरणे किंवा गाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे हा रेल्वे कायद्यानुसार गुन्हा आहे. अनेकदा रेल्वेगाडी सुटल्यानंतर प्रवासी धावत जाऊन गाडी पकडतात. अशावेळी एखाद्याप्रसंगी प्रवाशांचा पाय घसरून तो कोचखाली आल्यास त्याच्या चिंधड्या उडण्याची शक्यता राहते. प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करुन मृत्यूलाच आमंत्रण देतात. त्यामुळे रेल्वे सुटण्याच्या दहा मिनिटे आधी रेल्वेस्थानकावर पोहोचून गाडीत चढणे अत्यावश्यक आहे.
खाद्यपदार्थ खाणे टाळा
रेल्वेगाडी खाद्यपदार्थाची विक्री करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्हेंडर्सची नियुक्ती केली असते. यासाठी त्यांना रीतसर खाद्यपदार्थ विकण्याच्या परवाना आणि ओळखपत्र रेल्वेकडून देण्यात येते. परंतु अनेकदा रेल्वेत कुठलाही परवाना नसताना अनेक अवैध व्हेंडर्स खाद्यपदार्थ विकताना दिसतात. त्यांच्याकडील चटपटीत खाद्यपदार्थ दिसले की प्रवाशांच्या जिभेला पाणी सुटते. कुठलाही विचार न करता प्रवासी खाद्यपदार्थ विकत घेऊन खातात. परंतु अशाप्रकारे विकत घेतलेल्या खाद्यपदार्थात गुंगीचे औषध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशाने असे खाद्यपदार्थ सबंधित अधिकृत व्हेंडर्सकडून विकत घेणे गरजेचे आहे.
गुंगीचे औषध देऊन लूट
रेल्वे प्रवासात दररोज प्रवाशांसोबत अनेक प्रकारच्या घटना घडतात. प्रवासात प्रवाशांना लुटणारी टोळी अनेक रेल्वेत प्रवाशांच्या भोळेपणाचा फायदा घेते. त्यांना खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांची लूट करते. अनेकदा प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सोन्या-चांदीचे दागिणे पळविण्याचे प्रकार घडतात. रेल्वेत प्रवास करताना रेल्वे प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहे. परंतु त्या नियमाकडे डोळेझाक केल्यामुळे प्रवाशांच्या जीवीतावर बेतते. यामुळे प्रवासाला निघताना प्रवाशांनी काळजी घेऊन बचाव करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे केळी किंवा बिस्कीटाच्या माध्यमातून अनेकवेळा गुंगीचे औषध दिले जाते.
बर्थच्या आमिषाला बळी पडू नका
प्रवाशांचे तिकीट अनेकदा कन्फर्म नसल्यामुळे त्यांना बर्थ मिळत नाही. असे प्रवासी हेरुन रेल्वे स्थानकावर भामटे त्यांना हेरतात. बर्थ पाहिजे का? अशी विचारले तर प्रवाशाने होय म्हटले की, त्यांच्याकडून पैसे उकळतात, बर्थ क्रमांक घेऊन येतो म्हणून त्यांना एका ठिकाणी बसवतात. त्यानंतर त्या प्रवाशाचे तिकीट रद्द करुन आणि बर्थ मिळवून देण्याचे पैसे घेऊन पळ काढतात. अशाप्रकारे लूटल्याची अनेक उदाहरणे आहेत. रेल्वेगाडीचा चार्ट तयार झाल्यानंतर टीसीशिवाय कुणीही बर्थ मिळवून देऊ शकत नाही. परंतु ही साधी बाब प्रवाशांच्या लक्षात येत नसल्यामुळे फसवणूक होते.