लॉकडाऊनमुळे ४२ टक्के गुन्ह्यांमध्ये घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:43+5:30
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्याची सीमा लागून असल्याने येथील क्राईम रेट वाढणे साहजिकच आहे. परंतु पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा व कोरोनाचा संसर्ग यामुळे यंदा ३३९ गुन्ह्यांनी घट झाली आहे. भाग १ ते ५ या सदराखाली मागील वर्षी ८१३ गुन्हे मे अखेरपर्यंत दाखल करण्यात आले होते. सन २०२० मध्ये मे अखेरपर्यंत ४७४ गुन्हे दाखल झाले आहेत.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दरवर्षी वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्ह्यांची टक्केवारी वाढणे स्वाभाविक आहे. परंतु यंदा कोरोना विषाणूचा कहर सुरू असल्याने मागील अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा ४२ टक्के गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मागील वर्षी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ७५ टक्के होते. तर यंदा हे प्रमाण ८० टक्के आहे. गोंदिया जिल्हा पोलिसांच्या प्रयत्नांमुळे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ५ टक्क्यांनी वाढले आहे.
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्याची सीमा लागून असल्याने येथील क्राईम रेट वाढणे साहजिकच आहे. परंतु पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा व कोरोनाचा संसर्ग यामुळे यंदा ३३९ गुन्ह्यांनी घट झाली आहे. भाग १ ते ५ या सदराखाली मागील वर्षी ८१३ गुन्हे मे अखेरपर्यंत दाखल करण्यात आले होते. सन २०२० मध्ये मे अखेरपर्यंत ४७४ गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच यंदा लॉकडाऊनमुळे ३३९ गुन्ह्यांनी घट झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४२ टक्के गुन्ह्यांनी घट झाली आहे. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी या मालमत्ता संबधी मागच्या वर्षी २९१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यंदाच्या ५ महिन्यात १८० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ६७ गुन्ह्यांनी घट आहे. ह्या गुन्ह्यांना उघडकीस आणण्याचे प्रमाण मागच्या वर्षी ३५ टक्के होते तर यंदा ६० टक्के आहे. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलने यंदा २५ टक्याने वाढले आहे. शारीरिक विरूध्दचे गुन्हे (मारहाण) मागच्या वर्षी २८१ घडले होते यंदा त्यात १०६ गुन्ह्यांनी घट झाली आहे. यंदा १७५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३८ टक्यांनी शरीराविरूध्दच्या गुन्ह्यांनी घट झाली आहे.
होऊ लागले महिलांचे संरक्षण
महिलांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस विभागाकडून विविध उपाययोजना आखल्या जातात. त्याचा एक भाग व कोरोनामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे महिलांचे संरक्षण होऊ लागले आहे.महिलांवरील अत्याचाराच्या मागील वर्षात मे महिन्यापर्यंत १५२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यावर्षी पाच महिन्यात ६७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ८५ गुन्ह्यांनी घट झाली असून त्याचे प्रमाण ५६ टक्याने घटले आहे. महिलांचे संरक्षण आता होऊ लागले आहे.
विनयभंगाच्या गुन्ह्यात झाली घट
अपरहणाचे गुन्हे मागील वर्षी ४९ तर यंदा १५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजे लॉकडाऊनमुळे अपहरणाच्या ३४ गुन्ह्यांनी घट झाली आहे. बलात्कारचेही प्रमाण घटले आहे. मागच्या वर्षीच्या पाच महिन्यात ३१ बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यंदा १७ गुन्ह्यांची नोंद झाली असून १४ गुन्ह्यांनी घट झाली आहे. विनयभंगाच्या ७२ तक्रारी मागच्या वर्षी पोलिसांनी दाखल केल्या होत्या. यंदा ३६ गुन्ह्यांची नोंद झाली असून ३६ गुन्ह्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाशी लढता-लढता गुन्हे घडू नयेत याकडे पोलिसांनी लक्ष दिले आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांतील आरोपीपर्यंत पोहचून त्यांना जेरबंद करण्याचे काम पोलीस करीत आहे. मागच्या वर्षीची व यंदाची पाच महिन्याची तुलाना केल्यास ४२ टक्के गुन्हे यंदा घटले आहेत.
- मंगेश शिंदे
पोलीस अधीक्षक गोंदिया.