कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:30+5:30
जिल्ह्यात कोरोना बाधित २ रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हावासीयांना सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना त्या बोलत होत्या. यांतर्गत, जिल्ह्यात सक्रीय कोरोना बाधित रूग्ण ५२ असून दुर्दैवाने २ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगत त्यांनी,२ रूग्णांच्या मृत्यू मागची कारणे शोधली असता ते दोन्ही रूग्ण ६० वर्षांवरील होते. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते व त्यांनी उपचाराला उशीर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. या काळात प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
जिल्ह्यात कोरोना बाधित २ रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हावासीयांना सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना त्या बोलत होत्या. यांतर्गत, जिल्ह्यात सक्रीय कोरोना बाधित रूग्ण ५२ असून दुर्दैवाने २ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगत त्यांनी,२ रूग्णांच्या मृत्यू मागची कारणे शोधली असता ते दोन्ही रूग्ण ६० वर्षांवरील होते. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते व त्यांनी उपचाराला उशीर केला. जर कुणाला काही आरोग्यविषयक तक्रारी असतील तसेच कोरोनाशी संबंधित काही लक्षणे दिसत असतील तर त्यांनी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच कोरोनासाठी असलेल्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा. आरोग्य तपासणी करण्यास व संपर्क करण्यास कोणत्याही प्रकारे विलंब करू नये असे सांगीतले.
तसेच कोरोना बाधित रूग्णांमध्ये जिल्ह्यात लहान मुले देखील बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या संसर्ग काळात लहान बालकांना खेळण्यासाठी बाहेर इतरत्र पाठवू नये. १० वर्षांच्या आतील सर्व बालके आणि ६० वर्षांवरील व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाची संसर्ग साखळी तोडावी लागणार आहे. ही संसर्ग साखळी इथेच तोडली नाही तर भविष्यात वेगाने कोरोनाचा फैलाव होणार आहे. जिल्ह्यात बाधित रूग्णांपैकी १ जो बाधित रूग्ण आढळून आला आहे त्याच्या संपर्कातील व्यक्तींपैकी ३७ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले आहे.
अद्यापही १९० व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांचा चाचणी अहवाल प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील व्यक्तीला कोरोनाची बाधा पोहोचू नये यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे.
जिल्ह्याला कोरोनावर मात करायची असेल तर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे सहकार्य व त्यांची सकारात्मक भूमिका आवश्यक असून नागरिकांनी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी कळविले.
नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
याप्रसंगी डॉ. बलकवडे यांनी, ४ जुलैपासून एक विशेष मोहीम जिल्ह्यात सुरू केली असून जे व्यक्ती चेहरा व नाकावर मास्क किंवा रूमाल बांधणार नाही. तसेच एखाद्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी करतील अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडताना चेहरा व नाकावर मास्क किंवा रूमाल वापरावा, गर्दी करू नये आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये असेही सांगीतले.