पीएसीएलच्या कोट्यवधींची ग्राहकांना प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 06:00 AM2019-11-08T06:00:00+5:302019-11-08T06:00:31+5:30
पीएसीएल या कंपनीने देशभरातील ग्राहकांना मॅच्युरिटीचे पैसे न दिल्यामुळे ४५ हजार कोेटींचा अपहार झाल्याचा गुन्हा सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभागाने) या कंपनी विरुद्ध दाखल केला होता. त्यानंतर या कंपनीने देशभरात उघडलेल्या शाखांच्या ठिकाणाहून ग्राहकांच्या तक्रारी येण्यास सुरूवात झाली. दरम्यान कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हजारो ग्राहकांची झोप उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पाच व सहा वर्षात पैसे दुप्पट करून देण्याच्या नावावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड व आंध्रप्रदेश या चार राज्यांतील खातेदारांकडून पीएसीएल कंपनीने पैसे घेऊन त्यांना मॅच्युरिटीनंतर पैसे दिले नाही. एकट्या गोंदिया शाखेने एक कोटी सात लाख रूपयांची मॅच्युरिटी रक्कम ग्राहकांना परत केली नाही. कंपनीकडून पैसे कधी मिळणार याच प्रतिक्षेत ग्राहक आहेत.
पीएसीएल या कंपनीने देशभरातील ग्राहकांना मॅच्युरिटीचे पैसे न दिल्यामुळे ४५ हजार कोेटींचा अपहार झाल्याचा गुन्हा सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभागाने) या कंपनी विरुद्ध दाखल केला होता. त्यानंतर या कंपनीने देशभरात उघडलेल्या शाखांच्या ठिकाणाहून ग्राहकांच्या तक्रारी येण्यास सुरूवात झाली. दरम्यान कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हजारो ग्राहकांची झोप उडाली. गोंदिया जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांचे एक कोटी रुपयांवर पैसे बुडाले.
पाच वर्षात दामदुप्पट करून देण्याच्या नावावर पीएसीएल इंडिया लिमीटेडने गोंदियात सन १९९८ पासून सुरूवात झाली. या कंपनीने सुरूवातीपासून सन २०१२ पर्यंत असलेल्या सर्व ग्राहकांना नियमित मॅच्युरिटी दिली आहे. त्यानंतरच्या खातेदारांना मॅच्युरिटी दिली नसल्याने सन २०१३ पासून आतापर्यंतच्या मॅच्युरिटी झालेल्या ग्राहकांना त्यांचे पैसे मिळाले नाही. ग्राहकांनी या कंपनीच्या गोंदिया शाखेकडे जमा केलेली एक कोटी सात लाख रूपयांची रक्कम अद्यापही त्यांना मिळालेली नाही. या कंपनीशी ७०० एजेंट जुळलेले आहेत. या एजंटनी मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, मलाजखंड, छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव, डोंगरगड, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यातील हजारो खातेदारांना मॅच्युरिटी दिली नाही.
परिणामी त्या कंपनीच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. गोंदिया शाखेतील २२५ ग्राहकांनी पोलिसांत तक्रार केली होती. ग्राहकांचे एक कोटी सात लाख रुपये कंपनीकडून केव्हा परत मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. सहा महिन्यांपूर्वी पीएसएलचे पैसे मिळणार म्हणून ग्राहकांना आपापले अर्ज ऑनलाईन करा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपली कागदपत्रे त्या ग्राहकांनी आॅनलाईन केली होती. परंतु आतापर्यंत त्या ग्राहकांना पीएसीएलचा पैसा मिळाला नाही.
नागरिकांची लूट सुरूच
जिल्ह्यातील ग्राहकांना दामदुप्पट करुन देण्याच्या नावावर पीएसीएल या कपंनीकडू फसवणूक करण्यात आली. या कंपनीसारख्याच आणखी काही कंपन्या गोंदियात आहेत. खातेदार वारंवार कार्यालयाच्या हेलपाटे मारून पॉलीसी विड्रॉल करण्याची मागणी करतात. तेव्हा या कंपन्यांकडून उडावीउडवीची उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे अशा कंपन्यांवर वेळीच कारवाई होण्याची गरज आहे.