धानाचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:00 AM2020-12-05T05:00:00+5:302020-12-05T05:00:16+5:30
मजुरांच्या मजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने शेतीला लागणारा खर्च जास्त येत आहे. तर मिळालेले उत्पादन त्यापेक्षा कमी होत आहे. परिसरामध्ये धान उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. पीक विम्याची रक्कम सुध्दा मिळत नसल्याने विमा कंपनीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम मिळत नसेल तर पीक विमा काढायचाच कशाला असा सवाल शेतकरी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंडीकोटा : यावर्षी धान पिकावर मोठ्या प्रमाणात कीड रोगाने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेला. कीडरोगामुळे धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण झाले असून वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसारायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
यावर्षी चांगले उत्पन्न होणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र धान पिकांवर विविध कीड रोगाने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाला मुकावे लागले. एका एकरामध्ये चार ते पाच पोती धान होत आहेत तर काही शेतकऱ्यांना १० ते १२ पोती धान होत आहे.
मजुरांच्या मजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने शेतीला लागणारा खर्च जास्त येत आहे. तर मिळालेले उत्पादन त्यापेक्षा कमी होत आहे. परिसरामध्ये धान उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. पीक विम्याची रक्कम सुध्दा मिळत नसल्याने विमा कंपनीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम मिळत नसेल तर पीक विमा काढायचाच कशाला असा सवाल शेतकरी करीत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बँका, सोसायटीमधून कर्ज काढले. उत्पादन कमी प्रमाणात आल्याने कर्जाची परतफेड कुठून करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने यावर मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.