कचरा व्यवस्थापनासाठी १ हजार कोटींची तरतूद: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 09:29 IST2026-04-24T09:28:55+5:302026-04-24T09:29:44+5:30
सोनसोडोवर गॅसिफिकेशन प्रकल्पाचे लोकार्पण, 'ग्रीन गोवा, क्लीन गोवा' मोहिमेवर भर

कचरा व्यवस्थापनासाठी १ हजार कोटींची तरतूद: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : लोकांनी रस्त्याकडेला किंवा कुठेही कचरा टाकू नये. नागरिकांनी सर्व प्रकारचा कचरा पंचायती आणि नगरपालिकांकडे सुपूर्द केल्यास कचऱ्याचे योग्य नियोजन होऊ शकते. सरकारने गोवा स्वच्छ ठेवण्यासाठी सरकारी आणि खाजगी क्षेत्रात कचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांमध्ये १००० कोटींची गुंतवणूक केली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
येथील 'सोनसोडो' वरील कचरा समस्येवर मात करण्यासाठी १० टीपीडी क्षमतेच्या 'गॅसिफिकेशन' तंत्रज्ञानावर आधारित कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. २३) करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी 'ग्रीन गोवा, क्लीन गोवा' या मोहिमेवर भर देण्यात आला. कचरामुक्तीचे तंत्र सर्वांनी आत्मसात करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. गुरुवारी मडगाव नगरपालिकेने 'गॅसिफिकेशन' या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. यावेळी मंत्री दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई, रेजिनाल्ड लॉरेन्सो आणि उल्हास तुयेकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, मडगाव नगरपालिकेचे नगरराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
अशी वक्तव्ये खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री
'प्रक्षोभक भाषण करणाऱ्या खट्टरच्या शोधात गोवा पोलिस त्याच्या घरीही पोहोचले आहेत. सद्या तो फरार असला तरीही लवकरच पोलिस त्याला पकडतील हे शंभर टक्के खरे आहे. भविष्यात धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या घटना आणि वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत आणि कुणीही असल्या कृतीत पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी सुमारे ७.३० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, पुढील पाच वर्षाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी 'जीडी एन्व्हायर्नमेंट' या कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. सध्या मडगावचा ओला कचरा-काकोडा येथे नेण्यासाठी पालिकेला दरमहा १४ लाख रुपये खर्च करावे लागतात, ते यामुळे वाचतील असे सांगितले.
गुन्हेगारी घटना आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याच्या प्रयत्नांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी जनतेला संयम राखण्याचे आवाहन केले. मंत्री दिगंबर कामत यांनी हा प्रकल्प केवळ तात्पुरता उपाय नसून, मुख्यमंत्री सावंत यांच्या खंबीर निर्णयामुळेच हे शक्य झाले. लोकांनी रस्त्यावर कचरा पिशव्या फेकण्याची प्रवृत्ती थांबवली पाहिजे.
आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले, रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचे फोटो काढून पाठवा, आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू. या प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये श्रेयवादाची शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रकल्प सरकाराच्या इच्छेपेक्षा उच्च न्यायालयाच्या दबावामुळेच मार्गी लागल्याचे सांगितले. कचऱ्याचा प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन सोडवण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.