देवी लईराईचा जत्रोत्सव आजपासून; प्रशासन सज्ज, शिरगावात भक्तिमय वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 07:31 IST2026-04-21T07:30:55+5:302026-04-21T07:31:50+5:30
राज्य प्रशासनाने यंदा अतिशय कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.

देवी लईराईचा जत्रोत्सव आजपासून; प्रशासन सज्ज, शिरगावात भक्तिमय वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवास आज, मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. पुढील पाच दिवस हजारोंच्या संख्येने भाविकांची पावले शिरगावच्या दिशेने मार्गस्थ होतील. गेल्यावर्षीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने यंदा अतिशय कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.
आगामी पाच दिवसांच्या यात्राकाळात नियमांचे काटेकोर पालन करून भाविकांनी व धोंडांनी पूर्ण सहकार्य करून जत्रोत्सव पूर्णपणे यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासन व देवस्थान समितीने केले आहे.
जिल्हाधिकारी अंकित यादव, पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर, निरीक्षक विजय राणे, उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार शैलेंद्र देसाई यांच्यासह वाहतूक विभाग, अग्निशामक दल व संबंधित सर्व यंत्रणांनी गेल्या सहा महिन्यांपासून यात्रेची तयारी केली आहे. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी काही दिवसांपूर्वी तयारीचा आढावा घेतला. देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर व त्यांची टीम गेले सहा महिने प्रशासनाबरोबर सक्रिय आहे.
दरम्यान, जत्रोत्सवातील फेरीवर यंदा पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले असून खाज्यांच्या दुकानांना मंदिराच्या पाठीमागे जागा देण्यात आली आहे तर काही दुकाने होमकुंडाच्या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. इतरत्र कोठेही फेरी नसेल. जत्रेमुळे २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवावी.
भाविकांनी, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी केले आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सर्व भाविकांनी पाच दिवसात देवीचे दर्शन घेताना खबरदारी घ्यावी असे आव आवाहन केले आहे.
९०० पोलिसांचा बंदोबस्त
यात्रेच्या तयारीचा आढावा घेणारे माँक ड्रीलमध्ये तब्बल २०० पोलिस तसेच सरकारी खात्यांतील अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ, देवस्थान समितीचे पदाधिकारी, अग्निशामक दल व इतर व्यवस्थापनातील तीनशेहून अधिक लोक गुंतले होते. यात्रेमध्ये आधुनिक संपर्क यंत्रणा असून ९४ सीसीटीव्ही कॅमेरे, भाविकांसह धोंडांवरही नजर ठेवतील. जत्रोत्सवासाठी पोलिसांनी 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे.
जत्रोत्सवादरम्यान, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिस सतर्क राहणार आहेत. निरीक्षक विजय राणे यांनी सांगितले की, जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रण, पाकिंग व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात केली जातील. अतिरिक्त पोलिस फौज तैनात करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत राहतील.