दोडामार्ग विलिनीकरणाची मागणी निरर्थक : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 07:29 PM2019-10-31T19:29:01+5:302019-10-31T19:29:07+5:30

महाराष्ट्र सरकार सक्षम : तालुक्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प

Demand for Dodamar merger futile : Deepak Kesarkar | दोडामार्ग विलिनीकरणाची मागणी निरर्थक : दीपक केसरकर

दोडामार्ग विलिनीकरणाची मागणी निरर्थक : दीपक केसरकर

Next

सचिन खुटवळकर/पणजी : दोडामार्ग तालुका गोव्यात विलीन करावा, अशी मागणी जोर धरत असतानाच सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी ही मागणी निरर्थक असल्याचे सांगितले. तालुक्याच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
काही लोकांना अधूनमधून अशा कुरापती काढण्याची सवय असून तालुक्यातील बहुसंख्य लोकांना महाराष्ट्राबद्दल अभिमान असल्याने विलिनीकरणाच्या मुद्द्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान गोव्यातील भाजपच्या काही मंत्र्यांनी दोडामार्गमधील मतदारांना आमिष दाखविताना गोव्यातील सुविधांचा लाभ देण्याचे कबूल केले होते. या नेत्यांनी केलेल्या बुद्धिभेदामुळेच काही तरुण गोव्यात विलिनीकरण करण्याची मागणी करू लागले आहेत. तेथील तरुण गोव्यात रोजगारासाठी जातात व आरोग्य सुविधांसाठी गोव्यावर अवलंबून राहावे लागते, यात नक्कीच तथ्य आहे; परंतु लवकरच आडाळी येथे औद्योगिक वसाहत उभी राहणार असून पाच उद्योजकांनी नोंदणीही केली आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न बºयाच अंशी मिटणार आहे. आरोग्य सेवेबाबत महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच गोवा सरकारशी चर्चा करून तेथील रुग्णालयांत सिंधुदुर्गमधील रहिवाशांना आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या मागणीआडून मांडला जाणारा आरोग्य सेवेचा मुद्दाही तकलादू ठरतो, असे केसरकर म्हणाले.
तिळारी येथील धरण क्षेत्र परिसरासह दोडामार्ग तालुक्यातील विविध भागांत पर्यटन प्रकल्प विचाराधीन आहेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतल्यास परराज्यातच नव्हे, तर परजिल्ह्यातही रोजगारासाठी जाण्याची वेळ तरुणांवर येणार नाही. भेडशी येथे सुसज्ज आरोग्य केंद्र उभारले जात आहे. दोडामार्ग येथील आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचा प्रस्तावही प्रत्यक्षात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.

गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करा!
गोव्यात विलिनीकरण व्हावे, अशी मागणी करणा-यांनी आधी गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा, असे केसरकर म्हणाले. खाणबंदी, पर्यटन उद्योगाला लागलेली उतरती कळा आदी कारणांमुळे गोवा सरकारवर आर्थिक कसरती करण्याची वेळ आली आहे. मी वैयक्तिकदृष्ट्या गोव्याच्या व गोमंतकीयांच्या हिताचाच विचार करणारा माणूस आहे. मात्र, तेथील स्थितीचा आढावा घेतल्यास दोडामार्गवासीयांना सत्यस्थिती समजून येईल. त्यांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

विलिनीकरणासंबंधी चर्चेसाठी रविवारी बैठक
दोडामार्ग तालुका गोव्यात विलीन करण्याच्या चळवळीची दिशा ठरविण्यासाठी रविवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी दोडामार्ग येथील गणेश मंदिरात सकाळी १0 वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. तालुका निर्मितीनंतर चार विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र, तालुक्याला नेहमीच विकासाच्या प्रक्रियेतून डावलले गेले. या संदर्भात वाचा फोडण्यासाठी तसेच विलिनीकरणाबाबतची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे.

Web Title: Demand for Dodamar merger futile : Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.