गुप्तपणे तेंदूपत्त्याची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी/एटापल्ली : ग्रामसभेचे पदाधिकारी व ठेकेदार संगणमत करून गोपनीय पद्धतीने तेंदूपत्त्याचे भाव ठरवून तेंदूपत्त्याची विक्री करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी/एटापल्ली : ग्रामसभेचे पदाधिकारी व ठेकेदार संगणमत करून गोपनीय पद्धतीने तेंदूपत्त्याचे भाव ठरवून तेंदूपत्त्याची विक्री करीत आहेत. त्यामुळे ग्रामसभांना यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात भाव मिळत असून यामुळे ग्रामसभेला लाखो रुपयांचा फटका बसणार आहे.
मे महिन्यात तेंदूपत्ता संकलनाला सुरूवात होते. तेंदूपत्त्याचे संकलन करण्यापूर्वी लिलावाची प्रक्रिया राबविली जाते. शासनाने तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना दिले आहेत. ग्रामसभा स्वत: तेंदूपत्ता संकलन न करता कंत्राटदाराला तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार देतात. त्या मोबदल्यात प्रत्येक स्टॅडर्ड बॅगमागे रॉयल्टी मागितली जाते. तेंदूपत्त्याचा जास्तीत जास्त भाव मिळावा, यासाठी ग्रामसभांनी लिलावाची प्रक्रिया राबवावी. जास्तीत जास्त कंत्राटदारांना लिलाव माहित व्हावा, यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रकाशित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेने दिले आहेत. मागील वर्षी अनेक ग्रामपंचायतीने जाहिराती देऊन लिलाव केल्याने व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन बºयापैकी भाव मिळाला होता. मात्र यावर्षी कंत्राटदारांनी ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन गप्प केले आहे. यावर्षी तेंदूपत्त्याच्या जाहिराती न देताच लिलावाचे सोपस्कार आटोपण्यात आले आहेत. यामध्ये कंत्राटदाराने अत्यंत कमी किमतीत तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार प्राप्त केले आहेत. यामुळे ग्रामसभेच्या पदाधिकाºयांना कमिशन मिळाले असले तरी ग्रामसभेला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
अहेरी तालुक्यातील अनेक ग्रामसभांच्या तेंदूपत्ता लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली, असे सांगितले जात आहे. मात्र ग्रामपंचायतींनी लिलावाबाबतच्या जाहिराती दिल्या नाहीत. जाहिरात न देताच लिलाव करणे नियमबाह्य आहे. ही बाब ग्रामसभांना माहित असतानाही ग्रामसभा लिलावाची प्रक्रिया पुढे रेटत आहेत. काही ग्रामसभांमध्ये तर तेंदूपत्ता संकलनालाही सुरूवात झाली आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील ग्रामसभांना लाखो रुपयांचा फटका
ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या लाभासाठी कंत्राटदारासोबत संगणमत केले. कंत्राटदार म्हणेल तेवढी किंमत मान्य करून तेंदूपत्ता लिलावाचे सोपस्कार आटोपले. त्यामुळे मागील वर्षीपेक्षाही यावर्षी तेंदूपत्त्याला कमी भाव मिळाला आहे. देशपातळीवरील बाजारात तेंदूपत्त्याला भाव नाही, अशी चुकीची माहिती कंत्राटदारांमार्फत दिली जात आहे. या चुकीच्या माहितीला गावकरी सुद्धा बळी पडत आहेत. ग्रामसभेला लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. वृत्तपत्रात जाहिरात दिल्याशिवाय लिलावाची प्रक्रिया आटोपली असल्यास सदर प्रक्रिया रद्द करून याबाबत ग्रामसभेची चौकशी करण्याची प्रक्रिया प्रशासनाने राबवावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा लिलावाशिवाय तेंदूपत्त्याची विक्री करण्याचे प्रकार जिल्हाभरातील ग्रामसभांमध्ये वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.