धानोरातील वीज आठ तास गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:54+5:30
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंगलातील विद्युत लाईनच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. याचाच एक भाग म्हणून २७ मे रोजी धानोरा, चातगाव व मुरूमगाव वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. याकरिता महावितरणच्या गडचिरोली येथील कार्यालयाकडून सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : गेल्या सात-आठ दिवसांपासून उष्णतेचा पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. अशा स्थितीत नागरिक कुलर व पंख्याशिवाय स्लॅबच्या घरात राहू शकत नाही. मात्र नेमक्या अशाच वेळी २७ मे रोजी बुधवारला धानोरा शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा तब्बल ८ तास खंडित होता. परिणामी उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले. या प्रकारामुळे महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंगलातील विद्युत लाईनच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. याचाच एक भाग म्हणून २७ मे रोजी धानोरा, चातगाव व मुरूमगाव वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. याकरिता महावितरणच्या गडचिरोली येथील कार्यालयाकडून सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु येथील वीज कर्मचाऱ्यांनी एक तास उशिरा म्हणजे सकाळी ९ वाजतापासून झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कामास सुरूवात केली. हे काम सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरूच होते. परिणामी शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद होता. काम आटोपल्यावर ५ वाजून १० मिनीटांनी वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. नागरिकांनी तब्बल ८ तास ४५ अंश सेल्सिअस तापमानात कुलर व पंख्याविना घालविले. परिणामी वृद्ध नागरिक व लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. सध्या उष्णतामान वाढल्याने नियमित वीज पुरवठा सुरू ठेवण्याची गरज आहे.
बंद ठेवण्याबाबत पूर्वसूचना दिलीच नाही
यापूर्वी कोणत्याही ठिकाणची वीज दुरूस्तीची कामे किंवा झाडाच्या फांद्या तोडण्यासाठीच्या कामादरम्यान किती तास व कोणत्या भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे, याबाबतची पूर्वसूचना प्रसार माध्यमातून दिली जात होती. मात्र महावितरणच्या वतीने अशी कुठलीही पूर्वसूचना धानोरा तालुक्यातील नागरिकांना, शासकीय व निमशासकीय कार्यालयांना देण्यात आली नाही. त्यामुळे धानोरावासीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. डिस्चार्ज झाल्याने अनेकांचे मोबाईलसुद्धा बंद पडले होते.