मृत्यूला हुलकावणी देणारा नक्षलवादी कमांडर 'मृत्युंजय' सापळ्यात; तीन राज्यांच्या सीमेवरील दहशत संपुष्टात
By संजय तिपाले | Updated: March 13, 2026 15:58 IST2026-03-13T15:56:47+5:302026-03-13T15:58:39+5:30
Gadchiroli : १० लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे बक्षीस डोक्यावर होते. तीन राज्यांच्या सुरक्षा जवानांसह राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी (एनआयए) तो आव्हान बनला होता. मृत्युंजय हा केवळ झारखंडपुरता मर्यादित नव्हता.

Naxalite commander 'Mrityunjaya' who evaded death is trapped; Terror on the border of three states ends
गडचिरोली : झारखंडच्या लातेहार व पलामू या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील 'बुढापहाड' या दुर्गम पहाडी परिसरात आश्रय घेऊन गेली दोन दशके हिंसक कारवाया करणारा जहाल माओवादी कमांडर मृत्यूंजय भुईया ऊर्फ फारेश (४०,रा.नवदीह छिप्पाडोहर जि. लातेहार, झारखंड) याच्या मुसक्या आवळण्यात १२ मार्च रोजी सुरक्षा यंत्रणेला यश आले. ५० हून अधिक जवानांच्या बलिदानास कारणीभूत असलेला मृत्यूंजय 'बुढापहाड'चा शेवटचा मोहरा होता. त्याच्या अटकेने झारखंडसह छत्तीसगड व बिहारच्या सीमेवरील दहशतीचे काळे पर्व संपुष्टात आले आहे.
मृत्यूंजय भुईया ऊर्फ फारेश याच्यावर
१० लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे बक्षीस डोक्यावर होते. तीन राज्यांच्या सुरक्षा जवानांसह राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी (एनआयए) तो आव्हान बनला होता. मृत्युंजय हा केवळ झारखंडपुरता मर्यादित नव्हता. बिहारचा गया जिल्हा, छत्तीसगडची सीमा आणि झारखंडचे सारंडा जंगल या त्रिकोणी सीमावर्ती भागात त्याने दहशतीचे साम्राज्य उभारले होते. त्याच्यावर 'एनआयए'ने तीन गुन्हे दाखल केले होते. खंडणी, हत्या, स्फोट आणि जवानांवरील हल्ले अशा शंभरहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर आहे. पोलिस गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या मागावर होते, मात्र घनदाट जंगलाची खडा न खडा माहिती असल्याने तो प्रत्येक वेळी चकवा देण्यात यशस्वी होत होता.
धान्य नेण्यासाठी आला अन् अडकला
बुढापहाड पहाडीवर गेल्या ३२ वर्षांपासून माओवाद्यांची दहशत होती. माओवाद्यांना तेथे प्रशिक्षण देण्याचे काम होत असे. तिथे पोलिस किंवा सुरक्षा दलांचे जवान पाऊलही ठेवू शकत नव्हते. २०२२ मध्ये सीआरपीएफ, कोब्रा बटालियन व झारखंड पोलिसांनी संयुक्तपणे 'ऑपरेशन ऑक्टोपस' सुरू केले.
ऑक्टोपसप्रमाणे चहुबाजूंनी विळखा घालून माओवाद्यांना कोंडीत पकडणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. 'ऑपरेशन ऑक्टोपस'नंतर बुढापहाड नक्षलमुक्त झाले, अनेक साथीदार मारले , काही शरण आले. मात्र, 'मोस्ट वॉन्टेड' कमांडर मृत्युंजय पसार होता. मृत्युंजय लपून-छपून धान्य घेण्यासाठी जंगलाबाहेर यायचा. १२ मार्च रोजी तो धान्य घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कुमार गौरव यांना लागली होती, त्यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि तांदळाच्या गोणीसह या क्रूरकर्म्याला त्याच्या एका साथीदारासह पकडले.
१३ जवानांना जिवंत जाळणारी ती क्रूर रात्र !
मृत्युंजय भुईया हे दहशतीचे दुसरे नाव आहे. २०१३ मध्ये गढवा जिल्ह्यात त्याने १३ जवानांना रात्रीच्या सुमारास त्याने जिवंत जाळले होते. ही त्याची क्रूरता पाहून नक्षलवादी संघटनेत त्याचे वजन वाढले आणि तो 'झोनल कमांडर' बनला. केवळ बंदूक चालवणेच नव्हे, तर 'लँडमाईन तज्ज्ञ' म्हणून तो ओळखला जायचा. त्याने पेरलेल्या सुरुंगांनी आजवर अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे. त्याच्या अटकेने १३ जवानांच्या हत्येच्या कटू आठवणी ताज्या झाल्या.
संपत्तीवर टाच, साम्राज्य उद्ध्वस्त !
पोलिसांनी मृत्युंंजयची दुहेरी कोंडी केली होती. मनीष यादव या त्याच्या साथीदाराला ठार केले होते तर कुंदन खरवार यास अटक केली होती. बुढापहाडमध्ये माओवादविरोधी मोहीम राबवितानाच प्रशासनाने त्याची १४.२६ एकर जमीन जप्त करुन आर्थिक नाड्याही आवळल्या होत्या.