देवदातील गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:42+5:30
रेगडी जलाशय दिना नदीवर बांधण्यात आले आहे. सदर जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर याचे पाणी दिना नदीत सोडले जाते. त्यामुळे ओव्हरफ्लो सुरू असताना दिना नदीच्या पाण्याची पातळी वाढते. देवदावरून रेगडीला जाण्यासाठी दिना नदी ओलांडून जावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयाजवळ असलेल्या देवदा येथील नागरिकांना रेगडी व पुढचा प्रवास दिना नदीतून करावा लागतो. मात्र या ठिकाणी पूल नसल्याने नागरिक जीव धोक्यात घालून नदीतील पाण्यातून प्रवास करतात.
रेगडी जलाशय दिना नदीवर बांधण्यात आले आहे. सदर जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर याचे पाणी दिना नदीत सोडले जाते. त्यामुळे ओव्हरफ्लो सुरू असताना दिना नदीच्या पाण्याची पातळी वाढते. देवदावरून रेगडीला जाण्यासाठी दिना नदी ओलांडून जावे लागते. एटापल्लीसह परिसरातील अनेक नागरिक सरळ रस्ता म्हणून देवदा मार्गे रेगडी, घोट, चामोर्शीला येतात. त्यामुळे या मार्गावरून कर्मचारी व इतर दुचाकीस्वारांची नेहमीच वर्दळ राहते. काही दुचाकीस्वार नदीतून पाणी वाहत असतानाही वाहन टाकतात. स्थानिक गावकरी १०० रुपये घेऊन दुचाकी वाहन काठ्यांच्या सहाय्याने उचलून दुसºया बाजूला नेऊन देतात. काही नागरिक नदीतून पाणी असतानाही पायदळ प्रवास करतात.
सदर मार्ग अतिशय महत्त्वाचा असल्याने नदीवर पूल बांधावे, अशी मागणी देवदासह परिसरातील अनेक नागरिकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे केली आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. उन्हाळा व हिवाळ्यात या नदीत पाणी राहत नाही. मात्र पावसाळ्यात पाणी राहत असल्याने प्रवास धोकादायक आहे.
रेगडी जलाशयाने वाढते पाणीपातळी
रेगडी जलाशयाचे ओव्हरफ्लोचे पाणी दिना नदीत सोडले जाते. त्यामुळे पावसाळ्यात या नदीतून पाण्याचा प्रवाह अधिक राहतो. तरीही अनेक नागरिक जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी केली जात आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.