जारेगुडावासीयांचा नदीतून धोकादायक प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 05:00 AM2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:51+5:30
भामरागड लगत वाहत असलेल्या पामुलगौतम नदीच्या पलिकडे जारेगुडा, गोलागुडा ही गावे आहेत. येथील बहुतांश नागरिक मासेमारीचा व्यवसाय करतात. मासे विकण्यासोबतच इतर कामांसाठी येथील नागरिकांना तालुकास्थळ असलेले भामरागड गाठावे लागते. जारेगुडा ते भामरागड या दोन गावांच्या दरम्यान केवळ एक किमी अंतर आहे. मात्र या दोन गावांमध्ये पामुलगौतम नदी वाहते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : जारेगुडा व गोलागुडातील गावकऱ्यांना विविध कामांसाठी भामरागड येथे यावे लागते. यासाठी पामुलगौतम नदी ओलांडावी लागते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली राहत असल्याने नावेच्या माध्यमातून भामरागड गाठावे लागते. हा धोकादायक प्रवास वर्षभर करावा लागत असल्याने या ठिकाणी लोखंडी पूल बांधण्याची मागणी आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
भामरागड लगत वाहत असलेल्या पामुलगौतम नदीच्या पलिकडे जारेगुडा, गोलागुडा ही गावे आहेत. येथील बहुतांश नागरिक मासेमारीचा व्यवसाय करतात. मासे विकण्यासोबतच इतर कामांसाठी येथील नागरिकांना तालुकास्थळ असलेले भामरागड गाठावे लागते. जारेगुडा ते भामरागड या दोन गावांच्या दरम्यान केवळ एक किमी अंतर आहे. मात्र या दोन गावांमध्ये पामुलगौतम नदी वाहते. धोडराज मार्गे भामरागडला येता येते. मात्र यासाठी १५ किमीचा फेरा होते. एवढा फेरा मारून भामरागड गाठायचे म्हटल्यास दिवसभराची मोलमजुरी जाते. त्यामुळे बहुतांश नागरिक पामुलगौतम नदीतून डोंग्याने प्रवास करतात. पावसाळ्यात नदी भरली राहत असताना डोंग्याचा प्रवास धोकादायक राहते. जिल्ह्यात डोंगा उलटून जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, जोरेगुडावासीयांचे नाव आकाराने अतिशय लहान आहे. त्यामुळे ही नाव उलटण्याची सर्वाधिक भिती राहते. तरीही नागरिक या नावेने प्रवास करतात.
पूल उभारण्याची मागणी
भामरागड हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होते. हा निधी खर्च झाल्याचेही दाखविले जाते. मात्र गावांमध्ये विकास कामे दिसत नाही. परिणामी निधी जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जोरेगुडा व गोलागुडा येथील विद्यार्थी सुध्दा भामरागड येथे शिकण्यासाठी येतात. येथील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन शासनाने लहान पूल बांधून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. मात्र अजूनपर्यंत कार्यवाही झाली नाही.