शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 06:06 IST2026-04-26T06:04:21+5:302026-04-26T06:06:57+5:30
आम्ही साधू, संतांचा आदर करतो व भविष्यातदेखील करू. मात्र, शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध आहे असं राजे मुधोजी भोसले यांनी म्हटलं.

शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
नागपूर - बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संतापाचे वातावरण आहे. येथील भोसले राजघराण्यातील राजे मुधोजी भोसले यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात चुकीचे वक्तव्य खपवून घेणार नाही. महाराजांच्या पुण्याईमुळे आज ते बागेश्वर बाबा आहेत अन्यथा मौलवी बाबा राहिले असते, या शब्दांत त्यांनी टीका केली.
श्री आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारा प्रस्तावित भारतदुर्गा शक्ती स्थळाच्या जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात शिलान्यास सोहळ्यादरम्यान शुक्रवारी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.
वादग्रस्त वक्तव्य कशाला?
उत्तर भारतातून एनसीईआरटीची सुपारी घेतल्याच्या आविर्भावात महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांबाबत शास्त्री यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. महाराजांनी देव, देश आणि धर्मासाठी आयुष्य वेचले हेच सत्य आहे. जे लोक स्वतःला धर्माचे रक्षक म्हणवतात, तेच महाराजांबद्दल वादग्रस्त आणि चुकीची विधाने करत आहेत. आम्ही साधू, संतांचा आदर करतो व भविष्यातदेखील करू. मात्र, शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध आहे. - राजे मुधोजी भोसले
हा शिवरायांचा अपमान; माफी मागा : सपकाळ
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यात गुरू शिष्याचे नाते होते असे निखालस खोटे विधान केले असून त्यांनी तसेच या विधानावेळी उपस्थित असलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पत्रपरिषदेत केली. धीरेंद्र शास्त्री भोंदूबाबा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह असून असा अपमान करणे हे भाजप- संघाचे राष्ट्रीय धोरण आहे. महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. राज्यभरात या विरोधात तीव्र संताप आहे. शिवाजी महाराजांबद्दल अशी अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करत नसल्याने चुकीचा संदेश जात आहे, असे सपकाळ म्हणाले.