महावितरणच्या कार्यालयावर नागरिकांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:38+5:30
दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास नागरिकांनी सहायक अभियंत्यांना भेटण्यासाठी कार्यालयात धडक दिली. मात्र यावेळी येथे सहायक अभियंता, ऑपरेटर तसेच इतर कोणतेही कर्मचारी नव्हते. केवळ एका शिपायाच्या भरवशावर सदर उपकेंद्राचे कार्यालय सोडण्यात आले होते. नागरिकांनी शिपायाजवळ निवेदन ठेवून निघून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा गावालगतच्या खंडाळा येथे गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असून लपंडावही वाढला आहे. ही समस्या गंभीर झाल्याने गावातील नागरिकांनी गुरूवारी दुपारच्या सुमारास भेंडाळा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राच्या कार्यालयात धडक दिली.
दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास नागरिकांनी सहायक अभियंत्यांना भेटण्यासाठी कार्यालयात धडक दिली. मात्र यावेळी येथे सहायक अभियंता, ऑपरेटर तसेच इतर कोणतेही कर्मचारी नव्हते. केवळ एका शिपायाच्या भरवशावर सदर उपकेंद्राचे कार्यालय सोडण्यात आले होते. नागरिकांनी शिपायाजवळ निवेदन ठेवून निघून गेले.
निवेदनावर कैलास सातपुते, संदीप सातपुते, श्रीनिवास सातपुते, आकाश सातपुते, तानाजी चलाख, लालाजी सातपुते, विकास चलाख, हिवराज सातपुते, आयुश सातपुते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आष्टी भागात विजेचा लपंडाव, नागरिक हैराण
जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी परिसरात गेल्या चार महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीच्या वेळेला वारंवार वीज प्रवाह खंडित होत असल्याने आष्टी गावातील व परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
सध्या इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. मात्र रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. अभ्यास होत नसल्याने गुणांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झालेली आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे अनेक नागरिक व पालकांनी ही समस्या मांडली होती. मात्र कार्यवाही झाली नाही.
परिसरातील रामपूर, कोनसरी, रामकृष्णपूर, अनखोडा, येनापूर, अडपल्ली, गुंडापल्ली, चंदनखेडी, चौडमपल्ली, जयरामपूर व सिंघमपल्ली आदी गावात शिकारीचे प्रमाण वाढली असल्याची चर्चा सुरू आहे. तारेवरील वीज प्रवाह जंगलात सोडून शिकार केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. वन्यप्राणी शिकारीचे प्रमाण वाढल्यामुळेच वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.