तेलंगणातून आलेले २.२० कोटी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:00:52+5:30
प्राप्त माहितीनुसार, एमएच ३४, बीएफ ७२२१ या स्कॉर्पिओ वाहनातून संजय अवथळे (रा.आष्टी) आणि चालक सुधीर राऊत (रा.चंद्रपूर) हे मंचेरिया जिल्ह्यातून प्राणहिता नदीच्या पुलावरून महाराष्ट्रांच्या हद्दीत येत होते. यावेळी तेथील चेक पोस्टवर तैनात सिरोंचा पोलिसांच्या पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम आढळली. हे वाहन आसरअली भागातील तेंदूपत्ता कंत्राटदाराकडे जात असल्याचे समजते.

तेलंगणातून आलेले २.२० कोटी पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणाच्या सीमेतून दोन वाहनांमधून महाराष्ट्राच्या सीमेत आलेली तब्बल २ कोटी २० लाख रुपयांची रक्कम सिरोंचा पोलिसांनी पकडली. ही कारवाई मंगळवारी गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पुलांवर करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत रकमेची मोजणी आणि बयान नोंदणी सुरू होती.
प्राप्त माहितीनुसार, एमएच ३४, बीएफ ७२२१ या स्कॉर्पिओ वाहनातून संजय अवथळे (रा.आष्टी) आणि चालक सुधीर राऊत (रा.चंद्रपूर) हे मंचेरिया जिल्ह्यातून प्राणहिता नदीच्या पुलावरून महाराष्ट्रांच्या हद्दीत येत होते. यावेळी तेथील चेक पोस्टवर तैनात सिरोंचा पोलिसांच्या पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम आढळली. हे वाहन आसरअली भागातील तेंदूपत्ता कंत्राटदाराकडे जात असल्याचे समजते.
दुसऱ्या कारवाई टीएस ११, पीएन ०००१ ही इनोव्हा गाडी गोदावर नदीच्या पुलावरून महाराष्ट्राच्या हद्दीत पोहोचली असताना तेथील चेक पोस्टवर सिरोंचा पोलिसांच्या पथकाने गाडीची तपासणी केली. त्यात १ कोटी रुपयांची रक्कम आढळली. पोलिसांनी ही दोन्ही वाहने ठाण्यात नेली. ही कारवाई ठाणेदार अजय अहीरकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.
रकमेची मोजणी आणि त्यातील इसमांचे बयाण घेणे रात्रीपर्यंत सुरू होते. पुढील कारवाई एसडीपीओ प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनात सिरोंचा पोलीस करत आहेत.
दोन्ही वाहनांकडे नव्हता ई-परवाना
या कारवाईत पकडलेल्या दोन्ही वाहनांकडे लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात येण्यासाठी ई-परवाना नव्हता अशी माहिती आहे. ही रक्कम तेंदूपत्ता तोडाई करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्यासाठी तेलंगणातील कंत्राटदारांनी बोलविलेली असल्याचे सांगितले जात आहे. सध्या तेंदूपत्ता खरेदीचा हंगाम सुरू असून तेलंगणातील कंत्राटदार पत्ता खरेदीसाठी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. वाहनातील रक्कम त्यांची असली तरी परवान्याशिवाय होणाऱ्या वाहतुकीमुळे त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.