आजचा अग्रलेख: तरुण आहे ‘आशा’ अजूनी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 09:50 IST2026-04-13T09:50:23+5:302026-04-13T09:50:48+5:30
Asha Bhosle News:महान गायक किंवा गायिकेसाठी वापरली जाणारी स्वर्गीय आवाज, अजरामर गायकी, विविधता, अष्टपैलुत्व वगैरे विशेषणे व उपमांची मर्यादा, शब्दांचे थिटेपण अधोरेखित करीत आशा भोसले यांनी जगाचा निरोप घेतला.

आजचा अग्रलेख: तरुण आहे ‘आशा’ अजूनी...
महान गायक किंवा गायिकेसाठी वापरली जाणारी स्वर्गीय आवाज, अजरामर गायकी, विविधता, अष्टपैलुत्व वगैरे विशेषणे व उपमांची मर्यादा, शब्दांचे थिटेपण अधोरेखित करीत आशा भोसले यांनी जगाचा निरोप घेतला. आठ दशकांपेक्षा अधिक काळ सरस्वतीची आराधना, हिंदी-मराठीसह तब्बल वीस भाषांमध्ये विक्रमी बारा हजारांहून अधिक गाणी, गिनीज बुकमध्ये नोंद, झाडून सारे पुरस्कार या भाैतिक यशाच्या पलीकडे, त्याहून काहीतरी अधिक आशाताईंमध्ये होते. व्यक्ती म्हणून आयुष्यभर त्या मनमोकळ्या, बिनधास्त आणि आरपार पारदर्शक राहिल्या. प्रसिद्ध मंगेशकर घराण्याच्या परंपरागत गायकीला त्यांनी धक्का दिला. चाैकटी तोडल्या. भारतीय व पाश्चात्त्य गायकीचा समन्वय साधून त्यांनी स्वत:ची वेगळी शैली विकसित केली. तिला हिमालयाची उत्तुंग उंची मिळवून दिली. त्यांची ही शैली, त्यांचे गाणे, त्यातील हरकतींनी जगाला वेड लावले. हे सहज, नैसर्गिकपणे घडले नाही. गायिका म्हणून ती आशाताईंची गरज होती. प्रयोगशीलता त्या गरजेतून आली. त्या हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावत होत्या तेव्हाचा काळ चित्रपटांच्याही बाल्यावस्थेचा होता. थोरली बहीण लतादीदी तसेच गीता दत्त, शमशाद बेगम यांच्या गायनाची मोहिनी होती. लतादीदींचा मुलायम, गोड स्वर आणि गीता दत्त व शमशाद बेगमचा अनुनासिक पारंपरिक आवाज हीच चित्रपट गायनाची ओळख होती. फाळणीवेळी नूरजहाँ बेगम पाकिस्तानला निघून गेल्या, तरी त्यांचा भारतातील प्रभाव कायम होता.
वयाच्या दहाव्या वर्षी, १९४३ मध्ये ‘माझा बाळ’ चित्रपटात संगीतकार दत्ता डावजेकरांसाठी समूहगीत गाऊन आशाताईंनी या क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर बरीच वर्षे त्या लतादीदींच्या सावलीत होत्या. त्या गायच्यादेखील लतादीदींसारख्याच. परिणामी, वाट्याला गाणी कमी यायची. तसेही मोठ्या वृक्षाखाली लहान रोपटी खुरटून जातात, हे त्रिकालबाधित वास्तव आहे. आपण तसे खुरटून जाऊ नये, वेगळे स्थान तयार करावे, यासाठी आशाताईंनी परंपरागत गायकीचा पडदा झुगारून दिला. आवाजात धार, उत्साह, चैतन्य आणले. शमशाद बेगमसोबत ‘लेके पहला पहला प्यार’ या १९५६ च्या ‘सीआयडी’मधील गाण्याने आवाजाची नवी जादूगार आल्याचा सांगावा त्यांनी दिला होता; पण तो पुरेसा नव्हता. नव्या प्रयोगांची गरज आशाताईंनी ओळखली. त्याचवेळी चित्रपटसृष्टीनेही आधुनिकतेची कास धरली. जॅझ, राॅक, डिस्को, कॅबरे असे संगीत-नृत्याचे प्रयोग होऊ लागले. गाण्यात व जगण्यात अधिक मेलडी आली.
अवखळ, खट्याळ नायिका पडद्यावर अवतरल्या. त्यांच्यासाठी आशा भोसले तंतोतंत योग्य गायिका ठरल्या. आधी ओ. पी. नय्यर यांनी आणि १९८० नंतर राहुल देव बर्मन यांनी आशाताईंचे प्रयोग उचलून धरले. त्या अष्टपैलू गायकीला बहार आली. सत्तरचे दशक ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘चुरा लिया है तुमनेे’, ‘ये मेरा दिल’ किंवा ‘आजा.. आजा मैं हूँ प्यार तेरा’ अशा अजरामर गाण्यांनी गाजले, तर ऐंशीनंतरच्या दोन दशकांमध्ये ‘उमराव जान’मधील ‘दिल चीज क्या है’ व ‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारो है’ यांसारखी अगदी कालची वाटावीत अशी गाणी आली. ‘लगान’मधील ‘राधा कैसे न जले’, अशा गाण्यांनी शिक्कामोर्तब केले की आशा भोसले नावाच्या आवाजाचा झरा अजूनही खळाळता आहे. त्या थकलेल्या नाहीत. जिवंतपणीच त्या आख्यायिका बनल्या. त्यांचा आवाज अखेरपर्यंत चिरतरुण राहिला. ‘तरुण आहे रात्र अजूनी’, हे नुसते शब्द राहिले नाहीत. त्यांच्या गळ्याने त्या शब्दांना अमरत्व दिले. ..आणि आपण मराठी माणसे यासाठी भाग्यवान, की त्या अमृताचे सर्वाधिक कुंभ आशाताईंनी मातृभाषेत रिते केले. कुंभ कसले, त्यांचा कंठ अमृताचा अस्सीम साठा हाेता. श्रद्धायुक्त भजने व भक्तिगीते, प्रभातगीते, धीरगंभीर भावगीते, अवखळ बालगीते, रांगडी लोकगीते, ठसकेबाज लावण्या, रंगमंचीय सवाल-जबाब, शास्त्रीय-उपशास्त्रीय बाजाची नाट्यगीते, बेधुंद तरुणाईची द्वंद्वगीते, मखमली भावनांची श्रृंगारगीते असे गायनप्रकार त्या अमृताच्या धारा बनल्या. मराठी माणसाचे जगणे अक्षरश: सुंदर झाले. अजाणत्या बालकांपासून ते ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’ या शब्दांनी क्रांतीच्या मशाली पेटविणाऱ्या प्राैढांपर्यंत साऱ्यांनी आपली आयुष्ये आशाताईंच्या गाण्यांनी काठोकाठ भरून घेतली. जग समजून घेण्यासाठी धडपडणारे चिमुकले ‘नाच रे मोरा’वर थुईथुई नाचले. ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ असे विचारत बाळांच्या पापण्या आईच्या मांडीवर आजही जड होतात. आता रेल्वेचे अप्रूप राहिले नसले, तरी सुटीत मामाच्या गावाला जाताना ‘झुकझुक झुकझुक आगीनगाडी’ गुणगुणले जातेच. लाजऱ्याबुजऱ्या मुली ‘आला आला वारा, संगे पावसाच्या धारा’ म्हणत थोड्या उनाड बनतात, पाऊसधारा झेलतात. आजही लाडाची बहीण ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’ अशा वहिनीची अपेक्षा दादाकडून व्यक्त करतेच. पाैगंडास्थेत आजही, ‘बाई माझी करंगळी मोडली’ किंवा ‘बुगडी माझी सांडली’ अशा लाडिक तक्रारी होतात. सणावारांचा आनंद लुटताना, ‘बाई मी पतंग उडवीत होते’ हे जगाला सांगितले जातेच. आजही प्रियकराला ‘रूपेरी वाळूत, माडाच्या बनात’ येण्याचे निमंत्रण मिळते. माेरपंखी मनांना ‘हिरवा ऋतू’ हाच बरवा वाटतो आणि लग्नानंतर ओल्या हळदीच्या अंगाने ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ अशी मिश्कील विचारणाही होते.
आशाताईंबरोबरच हे इतके सारे रंग जीवनात भरण्याचे काम अन्य कुणी केले असेल तर ते फक्त लतादीदींनी. या दोन बहिणींच्या गायनप्रकृतीची तुलना सतत होत आली, आजही होते आणि भविष्यातही होत राहील. कारण, त्या दोघींसह मीना खडीकर, उषा मंगेशकर किंवा हृदयनाथ या सर्व भावंडांचे बालपण हलाखीत गेले. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या अकाली निधनानंतर लता व आशा यांच्यावर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आली. सर्व भावंडे एकाच क्षेत्रात असणे आणि तरीदेखील प्रत्येकाची स्वतंत्र ओळख असणे ही दुर्मीळातील दुर्मीळता मंगेशकर कुटुंबाने कमावली. त्यातही लतादीदी व आशाताई या दोघी सरस. रसिकांसाठी दोघीही महान गायिका. दोघींच्या गायकीत बरेच साम्य तसेच काही महत्त्वाचे फरकदेखील. सगळ्याच मंगेशकरांच्या संगीतसाधनेचा पाया शास्त्रीय संगीत. त्यामुळे दोघींचेही खरे प्रावीण्य शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचे. सुरेलता, भावपूर्णता आणि भावनिक खोली ही त्या गायनाची वैशिष्ट्ये. आशाताईंनी वेगळी वाट धरली. त्यांनी प्रयत्नपूर्वक शैली बदलली. आवाजाला अधिक धार आणली. गाण्यात उत्साह उभा केला. लतादीदींचा आवाज म्हणजे संथ वाहणारी रमणीय नदी. तिच्या काठावर बसले तर हळूच पाण्यात पाय टाकून जलझिम्मा खेळावा असे वाटावे. शांत, साैम्य, गोड, शुद्ध, स्वच्छ, गहिरे, सदाबहार, सुंदर अशा शालीन उपमांचा तो गोफ जणू. आशाताईंचे गाणे मात्र अव्याहत खळाळता निर्झर. स्फटिकासारख्या पाण्याचा नितळ, वेगवान झरा. अंगचटीला येणाऱ्या वाऱ्यासारखा खेळकर व खोडकर. अल्लड, अवखळ, ऊर्जामय, धारदार, कधी खट्याळ तर कधी रूसणारा.
लतादीदींचे स्वर सूक्ष्म व नाजूक भावपूर्ण, अंतरात खोल खोल रूतून बसणारे, तर आशाताईंचा आवाज बोल्ड, सेन्सुअस, मसालेदार, उत्साहाला उधाण व गाण्याला तडका देणारा. लतादीदींच्या गाण्यात पारंपरिकता तर आशाताईंच्या आवाजात परंपरेसोबतच नवता. लतादीदींची गाणी हाताच्या मुठीवर हनुवटी टेकवून, डोळे बंद करून ऐकायची, तर आशाताईंच्या गाण्यावर ठेका धरायचा, बेभान नाचायचे. लतादीदींचा आवाज म्हणजे मंदिरातील धूप, तर आशाताई म्हणजे अत्तराचा फाया. लतादीदींचा आवाज अमर, दैवी व महत्त्वाचे म्हणजे स्वर्गीय. त्याला आध्यात्मिक स्पर्श. तो जणू पृथ्वीवरचा नाहीच. तो आपल्या वाट्याला येणे ही ईश्वरी कृपा. स्वत: आशाताई म्हणायच्या की, दीदींचा आवाज ही देवाची देणगी आहे. त्याची पूजा करायला हवी. स्वत: आशाताईंचे गाणे मात्र पूर्णपणे मानवीय. त्या इथल्याच व आपल्याच आहेत, असा निर्वाळा त्यांच्या गाण्यांनी सतत दिला. सुख-दु:ख, प्रेम, श्रृंगार, द्वेष, मत्सर वगैरे मानवी आयुष्यातील सगळ्या भावभावना गाण्यातून अमर बनविल्या. गाणी अजरामर आणि गाणे शारीर बनविले. म्हणूनच त्या शरीराने गेल्या तरी आपल्या, माणसांच्या गायिका म्हणून अमर आहेत.