योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान, सदस्य, स्वराज इंडिया
‘भारतीय गणराज्याचा स्वधर्म’ या विषयावरील लेखमालिकेतील पहिल्या लेखात आपण सर्वधर्मसमभाव म्हणजेच सेक्युलरवादाची चर्चा केली. या दुसऱ्या लेखात समता किंवा समाजवाद या दुसऱ्या सूत्राचा विचार करू. समता हा एक आधुनिक विचार आहे. सर्व माणसे समान आहेत हा विचार नवा नाही; परंतु सर्व माणसे समान आहेत म्हणून सर्वांना सारखा सन्मान आणि संसाधने लाभली पाहिजेत ही विचारसरणी मात्र जगाला नवी आहे. समता हाच विचार केंद्रस्थानी ठेवून एक नवी सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची कल्पना तर पूर्णत: नवीन आहे. १९व्या शतकात युरोपात उमललेली समाजवादी विचारधारा आणि विसाव्या शतकातील बोल्शेविक क्रांती यांच्या प्रभावामुळे समतेचा हा विचार भारतात आला. त्यामुळे बऱ्याचदा, समतेची भावना भारतीय जनमानसाला अनोळखी आणि अस्वीकार्य असल्याचा समज पसरतो.
सगळ्या जगाचाच इतिहास हा एक प्रकारे विषमता आणि अन्याय यांचाच इतिहास. परंतु, भारतीय समाजात जातीय विषमता हे एक वेगळेच वास्तव आहे. त्यामुळे अन्य व्यवस्थांच्या तुलनेत भारतीय समाजव्यवस्था दोन बाबतीत वेगळी ठरते. जातिव्यवस्था विषमतेला संस्थात्मक संरचनेची स्थिर चौकट देते आणि या विषमतेवर हिंदू धार्मिक ग्रंथ घट्ट वैचारिक आणि धार्मिक पेहराव चढवतात. पण म्हणून विषमता हाच भारताचा स्वधर्म आहे, असे म्हणणे घाईघाईचे ठरेल. एखाद्या व्यवस्थेचे अस्तित्व हा काही ती व्यवस्था त्या समाजाचा आदर्श असल्याचा पुरावा नव्हे. भारताचा स्वधर्म धर्मशास्त्रे किंवा राजेरजवाडे यांच्या मर्जीवर कधीच अवलंबून नव्हता. बौद्ध दर्शन, सूफी-भक्ती परंपरा आणि राष्ट्रीय आंदोलनांसारख्या वेगवेगळ्या आंदोलनांतून हे स्पष्टपणे प्रतीत झाले. या तिन्ही मोठ्या आंदोलनांनी जातिव्यवस्था एका सुरात नाकारली. समतेच्या विचाराचा प्रसार आणि त्याच्या विशिष्ट भारतीय रूपाच्या मागे केवळ विदेशी प्रभाव होता, असे मुळीच मानता येणार नाही. संघर्ष आणि संवाद याद्वारेच या विचारसरणीने भारतीय जनमानसात आपले स्थान पक्के केले.
करुणा ही या सर्वांच्या मुळाशी असलेली संकल्पना होय. करुणा म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून आपले हृदय हेलावून जाणे. प्राणिमात्रांपैकी कोणीही, कुठेही दुःखी असेल तर ते दुःख नष्ट करण्याची तीव्र इच्छा म्हणजे करुणा. करुणेच्या या मूळ संकल्पनेतच, सद्यकालीन समाजवादातील सर्व विचारांचे बीज आहे. सच्ची करुणा ही दुःख निवारण्यासाठी केलेल्या व्यक्तिगत प्रयत्नांपुरती मर्यादित राहूच शकत नाही. समाजाला व्यापून राहिलेल्या दुःखाच्या मुळाशी असलेली संरचनात्मक कारणे विचारात घ्यावीच लागतील; आणि दुःख निवारणासाठी मूलगामी संस्थात्मक परिवर्तनाची मागणीही करावी लागेल.
सूफी आणि भक्ती चळवळीने समतेच्या विचाराला एक नवे परिमाण दिले. ईश्वराच्या दयेमुळेच या विश्वाची निर्मिती झाली असेल तर आपल्याला इथल्या सर्व प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगलीच पाहिजे. माणसाने अन्य माणसांची सेवा करावी, सर्वांवर प्रेम करावे हाच याचा सामाजिक संदर्भांतील अर्थ ठरतो. दया हाच न्यायाचा आधार असतो. भक्ती चळवळीतील संतांनी आपल्या स्वतःच्या ढंगाने आणि बऱ्याचदा सूफी संतांच्या साथीने समतेचा संस्कार बिंबवला. सामाजिक आणि आर्थिक विषमतेला थेट आव्हान देण्याऐवजी त्यांनी तिच्यावर तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांच्या आधारे प्रहार केला. कबीर, रविदास, तुकाराम आणि बसवण्णा यांच्यासारख्या संतांनी जातिव्यवस्थेतील श्रेष्ठ-कनिष्ठतेवर थेट घाव घातला. परंतु, असे न करणाऱ्या संतांनीही समतेचाच संस्कार समाजात दृढ केला.
एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वधर्माच्या या पैलूची नव्याने व्याख्या करण्याचे प्रयत्न दोन प्रकारे झाले. पश्चिमेकडून आलेली समाजवादी विचारधारा आणि रशियातील बोल्शेविक क्रांती यांच्याकडून प्रेरणा घेऊन आर्थिक समतेची स्थापना करण्याचा प्रयत्न करणे हा पहिला प्रकार. वासाहतिक राज्य आणि शिक्षण याद्वारे मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन जातिव्यवस्था आणि पुरुषप्रधान सत्ता यांना आव्हान देत सामाजिक समता स्थापन करण्याचा प्रयत्न करणे हा दुसरा. यात भारताच्या स्वधर्माला एक नवे परिमाण लाभून त्याचा विस्तार होत होता. या विस्ताराचे तीन पैलू होते. १) समता हा केवळ आध्यात्मिक सिद्धांत न राहता सामाजिक तत्त्वज्ञानाचा सिद्धांत बनला. या विचारसरणीने ईश्वरासमोरील समतेच्या जागी भौतिक विश्वातील समतेवर भर दिला. २) समतेचा विचार हा आदर्श समाजनिर्मितीचा केंद्रबिंदू बनला. किमान, ज्याची अवहेलना करणे अशक्य इतके महत्त्वाचे मूल्य बनला. ३) समता प्रस्थापनाची जबाबदारी केवळ व्यक्तीवर नव्हे तर राज्यसंस्थेवर आली. समताधिष्ठित समाजनिर्मितीचे आव्हान केवळ व्यक्तिगत संस्कार घडवण्यापुरते मर्यादित न राहता ते व्यवस्थेतील परिवर्तनाचे आव्हान बनले.
भारताच्या संविधानात समता हा आदर्श या तिन्ही अर्थांनी समाविष्ट केलेला आहे. समाजवाद हा शब्द राज्यघटनेत केव्हा आणि का घातला ही चर्चा निरर्थक होय. आपल्या मूळ रूपातच भारतीय राज्यघटना समतेच्या विचारांनी ओतप्रोत भरलेली आहे. स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण भारतीय शैलीत समतेचा विचार गणराज्याचा स्वधर्म परिभाषित करतो.
Web Summary : Equality in India evolved through struggles, dialogue, and spiritual movements. Rooted in compassion, movements like Bhakti challenged social hierarchies. The constitution enshrines equality, reflecting India's unique path.
Web Summary : भारत में समानता संघर्ष, संवाद और आध्यात्मिक आंदोलनों से विकसित हुई। करुणा पर आधारित, भक्ति जैसे आंदोलनों ने सामाजिक पदानुक्रम को चुनौती दी। संविधान समानता को स्थापित करता है, जो भारत के अद्वितीय मार्ग को दर्शाता है।