इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक कोल्हापूर
अहद पेशावर ते तहद तंजावर अवघे स्वराज्य व्हावे, ही इच्छा मनी धरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया घातला होता. म्हणूनच महाराजांच्या चरित्रकारांनी त्यांच्या स्वराज्य विस्ताराच्या योजनेचे गमकही नोंदवून ठेवले आहे. शिवाजी महाराजांनी फक्त राज्यस्थापना केली नव्हती, तर ते राष्ट्रनिर्माते होते, असे योग्य मूल्यमापनही केले आहे. यात प्रिन्स ऑफ वेल्स सारखे ब्रिटिश अभ्यासक आहेत, तर डॉ. बाळकृष्ण यांच्यासारखे महाराष्ट्रात न जन्मलेले, परदेशात शिक्षण घेतलेले; पण महाराष्ट्रात येऊन कर्तृत्व गाजवलेले इतिहास संशोधकही आहेत. सर जदुनाथ सरकार यांनीही ‘महाराज हे राष्ट्र निर्माते होते आणि त्यांची दृष्टी ही फक्त महाराष्ट्रापुरती नव्हती, तर ‘आसेतू हिमाचल’ स्वराज्याचा विस्तार करण्याची होती’ हे नोंदवून ठेवले आहे.
डॉ. बाळकृष्ण त्यांच्या ‘शिवाजी द ग्रेट’ या सखोल संशोधनात्मक चार खंडातील शिवचरित्रात लिहितात, शिवछत्रपती हे वास्तवात डोंगरी माणूसच होते. परंतु त्यांची कार्यशैली महाराष्ट्राच्या सिंहासारखी होती. महाराष्ट्रातल्या गरीब दीनवाण्या जनपद कोकरांचे महाराजांनी वनभेदी गर्जना करणाऱ्या सिंहांत रूपांतर केले. महाराष्ट्रातील प्रजा गरीब, पददलित दैववादी होती. शिवाजी महाराजांच्या प्रेरक व्यक्तित्वाने व जादुई स्पर्शाने त्यास झळाळी प्राप्त होऊन त्यांनी अतिमानवी कामगिरी केली. त्यांच्यातूनच कसलेले लढवय्ये, धाडसी वीर, परिपूर्ण सेनापती, विधायक दृष्टीचे मुत्सद्दी कारभारी, बलाढ्य मोगलांशी तुल्यबळ ठरलेले व शेकडो लढाया गाजवणारे अजोड कर्तबगारीचे पराक्रमी पुरुष घडले. त्यांनीच हे अजब परिवर्तन घडवून आणले. म्हणूनच शिवाजीराजांच्या कर्तृत्वाची नाममुद्रा भारताच्या इतिहासात पानोपानी चिरंतन उमटलेली राहील!
महाराजांचे निष्कलंक चरित्र हेही स्वराज्य विस्तार आणि वाढीचा एक मुख्य घटक होता याची साक्ष महाराजांच्या समकालीनानेच लिहिली आहे. फ्रान्समधून फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर म्हणून दूर दक्षिणेत राहून आपल्या हेरांकडून संपूर्ण भारताच्या राजकारणावर लक्ष ठेवणाऱ्या फ्रान्सिस मार्टिन या फ्रेंच व्यक्तीने ‘शिवाजी महाराजांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचे धवल चरित्र’ हे नोंदविले आहे. महाराजांचे स्वराज्य हे फक्त सह्याद्री आणि महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते; तर ते सिंधू नदीच्या उगमापासून कावेरी नदीच्या पैलतीरापर्यंत विस्तारलेले असावे, अशी महाराजांची इच्छा होती. अबे कॅरे १६७० च्या दशकात भारतात आला होता. त्याच्या प्रवासाची माहिती ‘द ट्रॅव्हल्स ऑफ दी अबे कॅरे इन इंडिया अँड द नियर ईस्ट १६७२ टू १६७४’ या नावाने तीन खंडांत प्रसिद्ध झाली आहे.
कॅरीच्या नोंदीत तो ५ डिसेंबर १६७२ रोजी चौल येथील शिवाजी महाराजांच्या अंमलदाराला भेटला होता. या अंमलदाराने कॅरेला सांगितलेली माहिती त्याने नोंदविली आहे ती अशी- खंबायतच्या राज्याची सीमा असलेल्या सिंधू नदीपासून बंगालच्या मुलखाच्या खूप पलीकडे असलेल्या गंगा नदीपर्यंतचा मुलुख जिंकण्याचा शिवाजी राजांचा बेत आहे, त्यांची महत्त्वाकांक्षा अमर्याद आहे आणि त्यांची क्षमता त्यांच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी आहे. अतिशय कुशल अशा स्थापत्य विशारदांपेक्षाही त्यांना किल्ल्यांच्या बांधणीचे अधिक ज्ञान आहे. भूगोलाचाही विशेष अभ्यास आहे. बहुतेक सर्व शहरांची, इतकेच नव्हे, तर भूप्रदेशांची आणि वनस्पतींची त्यांना माहिती आहे आणि त्यांनी त्यांचे अचूक नकाशे तयार करवले आहेत. - अबे कॅरेने केलेली नोंद ही स्वराज्याच्या विस्तार धोरणाविषयी तर स्पष्टता करतेच, पण महाराजांच्या एका अंमलदारालाही स्वराज्य स्थापनेचा हेतू स्पष्टपणे माहीत होता, हेही सांगते.
मराठ्यांची महत्त्वाकांक्षा दिल्ली जिंकण्याची होती याची साक्ष देणारे शिवपुत्र राजाराम महाराजांचे एक पत्र उपलब्ध आहे. ‘हे पत्र सर्व महाराष्ट्रीयन मुलांनी मुखोद्गत करावे,’ असे त्र्यंबक शंकर शेजवलकर या साक्षेपी संशोधकांनी लिहून ठेवले आहे. या पत्रात राजाराम महाराजांनी हनुमंतराव घोरपडे व कृष्णाजी घोरपडे या सरदारांनी रायगड, विजापूर, भागानगर, औरंगाबाद ते दिल्ली जिंकून घ्यावी म्हणून तब्बल सहा लक्ष होणांचा सरंजाम नेमून दिलेला होता.
शिवपुत्र राजाराम महाराजांचे हे पत्र ४ जून १६९१ रोजीचे आहे. याचवेळी दिल्ली सम्राट औरंगजेबाच्या कीर्तीचा सूर्य मध्यानीच्या तेजाने तळपत होता. आणि राजाराम महाराजांना राणी ताराबाईंसह दूर दक्षिणेतील जिंजी किल्ल्यावर जाऊन राहावे लागले होते. अशा परम संकटाच्या वेळीही मराठे दिल्ली जिंकण्याच्या योजना आखत होते. ही बाब शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्ताराची योजना तर सांगतेच, पण संकटाच्या काळातही मराठे शिवाजी महाराजांची शिकवण विसरले नव्हते, हेही स्पष्ट करते.
Web Summary : Shivaji Maharaj envisioned a vast Swarajya, aiming to expand from Sindh to Kaveri. His noble character and strategic brilliance inspired unwavering loyalty, transforming ordinary people into formidable warriors. Even facing adversity, the Marathas, driven by Shivaji's vision, planned to conquer Delhi, demonstrating their enduring ambition.
Web Summary : शिवाजी महाराज ने सिंध से कावेरी तक स्वराज का विस्तार करने की कल्पना की। उनके महान चरित्र और रणनीतिक प्रतिभा ने अटूट निष्ठा को प्रेरित किया, साधारण लोगों को दुर्जेय योद्धाओं में बदल दिया। विपरीत परिस्थितियों का सामना करते हुए भी, मराठों ने दिल्ली को जीतने की योजना बनाई, जो शिवाजी के दृष्टिकोण से प्रेरित होकर उनकी स्थायी महत्वाकांक्षा को दर्शाता है।