शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 06:59 IST

छगन भुजबळांची खदखद, अजित पवारांचे विधान अन् बरंच काही...

लोकसभा निवडणूक निकालास एक आठवडा शिल्लक असतानाच महाराष्ट्रातील महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येताच महायुतीत खडाजंगीस प्रारंभ होण्याचा अंदाज होताच; पण प्रत्यक्षात मतदानाचा अखेरचा टप्पा आटोपण्यापूर्वीच तलवारी परजण्यास प्रारंभ झाला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वाट्याला न गेल्याने निवडणूक लढविण्याची इच्छा दाबून टाकावी लागलेले त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीच, पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला गर्भित इशारा दिला आहे. लोकसभा निवडणूक लढवता न आल्याची नाराजी भुजबळ यांनी कधीच लपवून ठेवली नव्हती. किंबहुना नाशिक मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार हे जाहीर होण्यापूर्वीच, भुजबळांनी खदखद व्यक्त करायला सुरुवात केली होती. महायुतीत सर्व काही ठीक नाही, असा अंदाज तेव्हाच आला होता.

त्यातच सोमवारी मुंबईत पार पडलेल्या त्यांच्या पक्षाच्या बैठकीत भुजबळ यांनी, विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाप्रमाणे व्हायला नको, भाजपने दिलेल्या ‘शब्दा’नुसार ८० ते ९० जागा मिळायलाच हव्या, अशा आशयाचे वक्तव्य केले. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर ‘अब कि बार, चारसौ पार’ या भाजपच्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसल्याचे विधान करून, त्यांनी थेट मधमाशांच्या पोळ्यातच हात घातला! त्याच बैठकीत त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते अजित पवार यांनी, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नेमके काय होईल, हे ब्रह्मदेवदेखील सांगू शकणार नाही, असे वक्तव्य केल्याने, महायुतीत आलबेल नसल्याच्या शंकेला खतपाणीच मिळाले. अजित पवार तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर उद्धव ठाकरे यांच्यापासून चार हात अंतर राखणारा मुस्लीम समुदाय यावेळी त्यांच्या पाठीशी उभा राहिला, असेही विधान त्यांनी केले. भुजबळ व पवार यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महायुतीतील तिन्ही पक्ष वाटाघाटी करून विधानसभा निवडणुकीतील जागावाटप निश्चित करतील, असे वक्तव्य करून आग विझवण्याचा प्रयत्न केला खरा; पण त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे नेते नीलेश राणे आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी भुजबळांना त्यांच्या विधानांसाठी धारेवर धरल्याने, पुन्हा एकदा आगीत तेल ओतले गेले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपसाठी देशभरात आणि त्यातही महाराष्ट्रात अनुकूल लागला तर ठीक; अन्यथा आगीचा भडका उडण्याचीच शक्यता अधिक! मुळातच भाजपचा मूळ कार्यकर्ता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत पाट लावण्याच्या पक्षनेतृत्वाच्या निर्णयाशी सहमत नव्हता; पण पक्षशिस्तीमुळे उघडपणे कोणी नाराजी बोलून दाखवली नाही. हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे शिवसेना भाजपचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट भाजपसोबत आला, तेव्हा भाजप कार्यकर्त्यांना त्यामध्ये काही वावगे वाटले नव्हते. अर्थात भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना तेदेखील रूचले नव्हते. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडाच शिकवायला हवा, असे त्यांचे मत होते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णयही भाजपच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता; पण तरीदेखील शिंदेसेनेच्या शिवसैनिकांसोबत जुळवून घेणे भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कठीण गेले नाही.

अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांसोबत जुळवून घेणे मात्र त्यांना जमलेच नाही. त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर झाली आहे, तिने मूळ कधी धरलेच नाही, हे सतत जाणवत होते. छगन भुजबळ, अजित पवार, निलेश राणे आणि संजय शिरसाट यांच्या विधानांनी ती वस्तुस्थितीच अधोरेखित केली आहे. बरोबर एक आठवड्याने लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल. त्यामध्ये घटक पक्षांची कामगिरी कशी होते, यावरच महायुतीचे भवितव्य अवलंबून असेल. भाजपला सत्ता मिळाली व महाराष्ट्रातही त्या पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली, तर महायुतीतील भाजपचे वर्चस्व अधिक वाढेल. दुसरीकडे शिंदेसेना आणि अजित पवार गटाची कामगिरी समाधानकारक झाली नाही, तर त्यांना एक तर भाजपमागे फरपटत जावे लागेल किंवा मूळ पक्षाशी तडजोडीची तयारी ठेवावी लागेल. दोन्ही पर्याय मान्य नसल्यास, स्वत:ला मजबूत करण्याचे प्रयत्न करावे लागतील, जे अजिबात सोपे नसेल. भाजपची कामगिरी अपेक्षेनुरूप नसल्यास, त्या पक्षालाही नको त्या तडजोडी कराव्या लागतील. थोडक्यात, आजपासून एका आठवड्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण नवे वळण घेणार, हे निश्चित!

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे