मोदी-शहांचा भाजप खडसे, पंकजांना ना समजला, ना उमजला

By संदीप प्रधान | Published: October 30, 2020 09:20 AM2020-10-30T09:20:41+5:302020-10-30T09:21:34+5:30

Eknath Khadse Pankaja Munde: खडसे असो की पंकजा मुंडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वातील बदलेला भाजप एकतर नीट समजलेला नाही किंवा समजून उमजलेला नाही.

eknath Khadse and Pankaja munde did not understand bjp under pm modi and amit shahs leadership | मोदी-शहांचा भाजप खडसे, पंकजांना ना समजला, ना उमजला

मोदी-शहांचा भाजप खडसे, पंकजांना ना समजला, ना उमजला

googlenewsNext

- संदीप प्रधान

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा विरोध डावलून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी मधू चव्हाण यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे महाराष्ट्रातील भाजपमध्ये आगडोंब उसळला. मुंडे यांच्या राजीनाम्याच्या इशाऱ्याने दिल्लीपर्यंत या वादाचे हादरे बसले. मुंडे यांच्या समर्थनार्थ छगन भुजबळ त्यांच्या भेटीला गेले. राज्यात ओबीसींचा नवा पक्ष निर्माण होणार, अशा चर्चा सुरु झाल्या. व्यंकय्या नायडू यांची धावपळ सुरु झाली, लालकृष्ण अडवाणींकडे बैठकांचा सिलसिला सुरु झाला, मुंडे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु झाले. अखेर दिल्लीत या वादावर पडदा पाडला गेला. अर्थात त्यावेळीही मुंडे यांची समजूत काढण्याकरिता एकही बडा नेता मुंबईत उठून आला नव्हता. कारण भाजप हा केडरबेस पक्ष असून एखादा बडा नेता गेल्यावर पक्षाचे नुकसान होते पण पक्ष संपुष्टात येत नाही. मुंडे यांच्या पक्षात रुसण्याच्या अशा घटना किमान दोन-तीनवेळा घडल्या होत्या.
या इतिहासाची आठवण होण्याचे कारण त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त केलेले आक्रमक भाषण, पंकजा यांनी शरद पवार यांचे कौतुक करणारे केलेले ट्विट, पंकजा यांचे कट्टर विरोधक व बंधू धनंजय मुंडे यांच्या शेजारी बसून ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यांबाबतच्या बैठकीला त्यांनी लावलेली हजेरी वगैरे घटनांमुळे भाजपत पंकजा यांची कोंडी सुरु असल्याच्या चर्चा कानावर येत आहेत. अगदी अलीकडेच ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाला मी माझ्या आयुष्यातील ४० वर्षे देऊनही पक्षाने माझी उपेक्षा केली, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. गोपीनाथ मुंडे हे ऊसतोडणी कामगारांच्या संघटनेचे नेते होते. वंजारा समाजातील हे कामगार लक्षावधींच्या संख्येने असून मुंडे यांच्या पश्चात पंकजा या त्यांचे नेतृत्व करीत होत्या. मात्र पंकजा यांना शह देण्याकरिता सुरेश धस यांना या ऊसतोडणी कामगारांचे नेतृत्व करण्याकरिता भाजपने बळ दिले. त्यामुळे पंकजा या कमालीच्या अस्वस्थ आहेत. त्यातूनच त्यांनी शिवाजी पार्कवर शक्तीप्रदर्शन करण्याचा इशारा दिला आहे. भाजपच्या नेत्यांच्या दाव्यानुसार, पंकजा या देशाबाहेर असताना कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे त्या विदेशात अडकल्या. तेथून परत आल्यावर त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले. या काळात ऊसतोडणी कामगारांचे नेतृत्व जर पक्षाने धस यांना स्वीकारण्यास भाग पाडले नसते तर कदाचित राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ते आपल्याकडे हिसकावून घेतले असते. शिवाय गोपीनाथ मुंडे हे ज्याप्रमाणे ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नाकरिता अहोरात्र काम करायचे तसा पंकजा यांचा पिंड नाही, अशी भाजपच्या मंडळींची तक्रार आहे. मात्र पंकजा मुंडे समर्थकांना हा दावा मान्य नसून हेतूत: पक्षातील काही लोक आपले नेतृत्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कदाचित धनंजय हे ‘मुंडे कुटुंबा’चे सदस्य असल्याने धस यांच्यापेक्षा धनंजय यांच्याकडे ऊसतोडणी कामगारांचे नेतृत्व गेले असते तर ते कदाचित पंकजा यांना स्वीकारार्ह वाटले असू शकेल.



खडसे असो की पंकजा मुंडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वातील बदलेला भाजप एकतर नीट समजलेला नाही किंवा समजून उमजलेला नाही. काँग्रेसमध्ये जेव्हा इंदिरा गांधींचे नेतृत्व अत्यंत ताकदवान होते तेव्हा काही प्यादी त्यांनी वेगवेगळ्या राज्यांत सत्तेवर बसवली. इंदिरा व संजय गांधी यांच्या शब्दापलीकडे जाण्याची अनेकांची प्राज्ञा नव्हती. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अनेक पक्षांचे होते व खुद्द वाजपेयी हे कवी मनाचे व लोकशाही मूल्य मानणारे नेते होते. इंदिरा गांधी या ‘हम करेसो कायदा’ प्रवृत्तीच्या असल्याच्या तरी कला, साहित्य, संगीत वगैरे क्षेत्रात त्यांना पंडित नेहरु यांच्या सहवासामुळे रुची होती. मोदी-शहा हे चोवीस तास केवळ राजकारणाचा विचार करतात, या दोघांना संगीत-साहित्य, कलादृष्टी असल्याचे प्रकर्षाने जाणवलेले नाही. एखादा रोबो जसा न थकता काम करतो तसे हे दोघे करतात. त्या दोघांच्या आदेशापुढे जाणे, स्वत:चे स्तोम माजवण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत गंभीर गुन्हे आहेत. केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्रीपद स्वीकारावे, असा मोदींचा आग्रह होता. मात्र सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर जर राज्यात भाजपचे सरकार आले तर आपल्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडावी, अशीही गोपीनाथ मुंडे यांची इच्छा होती. त्यामुळे केंद्रीयमंत्रीपद स्वीकारताना ते तशी अट घालू पाहायला लागले. मात्र मोदी यांनी मुंडे यांचा हट्ट स्वीकारला नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मुंडे केंद्रात मंत्री झाले नाहीत. ही सल मुंडे यांच्या मनात होती. तशी कबुली पांडुरंग फुंडकर यांनी विधान परिषदेत दिलीही होती. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली तरी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नाही हे लक्षात आल्यावर मुंडे यांनी जड अंत:करणाने केंद्रात मंत्रिपद स्वीकारले होते. वडिलांच्या बाबतीत घडलेल्या या घटनांतूनही पंकजा यांनी बोध घेतला नाही. राज्यात भाजप सरकार आल्यावर लोकांच्या मनातील मुख्यमंत्री मीच असल्याचा जाहीर दावा त्या करीत राहिल्या. वंजारी समाजातील काही आमदार व नेते यांना घेऊन भाजपमध्ये आपले व्यक्तीस्तोम निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु राहिले. अर्थातच ही बाब मोदी-शहा यांना रुचणारी नसल्याने धस यांचा पर्याय पक्षाने उभा करण्यास सुरुवात केली. आताही खडसे यांच्या पक्ष सोडण्याच्या पार्श्वभूमीवर आक्रमक होऊन नेतृत्वावर दबावतंत्राचा वापर करु, अशी जर पंकजा यांची अपेक्षा असेल तर त्या मोठी चूक करीत आहेत. खडसे हेही आपल्याला मुख्यमंत्रीपद नाकारले हे अखेरपर्यंत स्वीकारु शकले नाहीत. पक्षातील काही आमदारांची मोट बांधून आपल्याला नेतृत्व प्राप्त करता येईल, अशा भ्रमात ते प्रयत्न करीत राहिले. मोदी-शहा यांनी खडसे यांचे उत्तर महाराष्ट्रातील प्राबल्य कमी करण्याकरिता गिरीश महाजन यांना ताकद दिली.



देवेंद्र फडणवीस या तुलनेने तरुण व नवख्या नेत्याकडे मुख्यमंत्रीपद दिल्याने खडसे हे नाराज होते. गोपीनाथ मुंडे यांनी ज्यांना उभे केले तेच आपल्या मार्गातील काटा ठरले ही पंकजा यांची भावना असली तरी प्रत्यक्षात फडणवीस यांच्या रुपाने नागपुरातून ब्राह्मण नेतृत्व महाराष्ट्रात उभे करण्यामागे नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षांना कात्री लावणे हाच मोदी-शहा यांचा हेतू होता. अर्थात ‘एका दगडात दोन पक्षी’ या न्यायाने मुख्यमंत्रीपदाचे अन्य इच्छुकही गारद झाले. मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार उलथवून भाजपचे सरकार स्थापन करणारी मोदी-शहा यांची जोडगोळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ देते व आपल्या पक्षाला विरोधात बसण्यास भाग पाडते हे खटकते. कदाचित फडणवीसांसारख्या तरुण नेत्याला मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म मिळाल्यास ते अधिक आक्रमक होतील, अशी भीती मोदी-शहांना वाटत असू शकते.



चंद्रशेखर बावनकुळे, किरीट सोमैया, विनोद तावडे अशा काही मातब्बर नेत्यांनाही मोदी-शहा यांनी धक्का दिला आहे. मात्र केंद्र प्रबळ असताना मिठाची गुळणी घेऊन गप्प बसणे व पक्षात सक्रिय असल्याचे कृतीतून दाखवत राहणे हाच तूर्त पर्याय असल्याचे गुपित कुणी त्यांना सांगितल्याने व त्यांनी ते आचरणात आणल्याने कदाचित भविष्यात त्यांची तपश्चर्या फळाला येऊ शकेल. मात्र खडसे यांना बदलेला भाजप न कळल्याने त्यांना पक्ष सोडावा लागला तर पंकजा यांना वेळीच हे भान आले नाही तर कदाचित त्यांनाही वेगळा निर्णय घ्यायला लागू शकतो.

Web Title: eknath Khadse and Pankaja munde did not understand bjp under pm modi and amit shahs leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.