शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

भाजपाला 'मविआ' ची भीती वाटते हे खरे; पण...

By यदू जोशी | Updated: March 31, 2023 08:49 IST

उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती, शरद पवारांचा मजबूत एकखांबी तंबू आणि घट्ट पाळामुळांची काँग्रेस ही महाविकास आघाडीची बलस्थाने! - पण तेवढे पुरेल?

महाविकास आघाडीची जाहीर सभा येत्या २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. ही आघाडी एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकीला सामोरी गेली तर काय अशी धास्ती भाजपला नक्कीच वाटत असणार. या आघाडीची त्सुनामी आली तर आपण टिकणार नाही असा भाजपचा फीडबॅक आहे म्हणतात. भाजपचे काँग्रेससारखे नसते. तहान लागल्यावर ते विहीर खोदत नाहीत. वेगवेगळ्या पद्धतीचे नियोजन हा त्यांच्या नियमित कामाचा भाग असतो. थोडी काही ढिलाई झाली की वरून शहा नहुांचा डंडा पडतो. विधानसभा निवडणुकीला दीड वर्ष बाकी असताना भाजपने खासगी कंपनीला काम देऊन सध्याच्या १०५ आमदारांच्या मतदारसंघात सर्वेक्षण करविले.

महाविकास आघाडी निवडणुकीला एकत्रितपणे सामोरी गेली तर सध्याचे किती आमदार निवडून येऊ शकतील यासाठी मुख्यत्वे हे सर्वेक्षण होते. ज्या मतदारसंघांत भाजपचे आमदार नाहीत तिथेही सर्वेक्षण होणार आहे. महाविकास आघाडीची मूठ एकत्र राहिली तर कोणती सामाजिक समीकरणे कशी जुळवायची आणि शह कसा द्यायचा यावर भाजपची थिंक टैंक सध्या काम करत आहे. भाजपच्या दिमतीला संघाची भक्कम फळी असते. महाविकास आघाडीचा विचार केला तर एकत्रित शिवसेनेकडे पूर्वी शिवसैनिकांची अशी फळी होती. पण आता तीदेखील तेवढी राहिलेली नाही.

भाजपा काय करु शकेल?

छत्रपती संभाजीनगरच्या सभेच्या निमित्ताने आघाडीतील दिग्गज नेते एकत्र येत आहेत. नेत्यांची तोंडे एकमेकांच्या दिशेला वळली आहेत, ती पुढेही तशीच राहिली, तरच भाजपला आव्हान मिळेल. ही वज्रमूठ राहू नये यासाठी भाजप डावपेच आखेल. आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना भाजपच्या गळाला लावण्याचे काम केले जाईल. ज्यांना भाजपमध्ये जायचे नाही त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पर्याय आहेच. वैचारिक निष्ठा असलेल्या पक्षातील लोकांना फोडणे जरा कठीण असते. जिथे पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठेचे स्तोम आहे असा पक्ष, त्यातील नेत्यांना फोडणे तुलनेने सोपे असते. म्हणूनच काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांहाती कमळ देणे अधिक सोपे आहे असे भाजपला वाटते. राष्ट्रवादीतील एकेका नेत्याला उचलून आणायची आणि काँग्रेसला एकाचवेळी मोठे धक्के द्यायचे अशी भाजपची रणनीती असू शकते. त्यादृष्टीने काँग्रेसमधील काही भक्कम नेत्यांशी भाजपचे नेते संपर्कात आहेत म्हणतात.

पुढच्या वर्षी मोठे ऑपरेशन केले जाऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या नेत्यांना भेटून "आम्ही पुढच्यावेळी तुमच्याच सोबत राहू, पण आता आम्हाला काही ताकद द्या, मतदारसंघासाठी निधी द्या." असे बार्गेनिंग करत आहेत. ते उद्या भाजपमध्ये जातील वा जाणारही नाहीत, पण पक्षापेक्षा निधी महत्त्वाचा हे आतापासूनच त्यांच्या डोक्यात असणे ही काँग्रेस राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे. अपहरण करून खंडणी मागितली जाते. इथे अपहरणासाठी निधीची खंडणी दिली जाऊ शकते, असे आमदार कच्चे दुवे आहेत, भाजपकडून त्यांना बरोबर गोंजारले जाईल. आज महाविकास आघाडीमध्ये एकीचे स्पिरिट दिसते. ते वरवरचे की आतूनही खूप घट्ट आहे हे लोकसभा निवडणूक जवळ येताच स्पष्ट होईल. एकत्र राहणे ही तिघांचीही अपरिहार्यता; त्यातूनच ठाकरे गटाच्या आमदारांना राहुल गांधींबद्दल विधानसभेत नाराजी व्यक्त करता येत नाही आणि राहुल गांधींना सावरकरांचा मुद्दा सोडून द्यावा लागतो.

राज्यात भाजपचे सरकार असणे, मोदी-शहांची रणनीती, त्याला शिंदे-फडणवीसांची जोड, केंद्र व राज्यांच्या तपास यंत्रणांचा ससेमिरा या सगळ्यांतून सुटून तन-मन-धनाने कोणते नेते भाजपला शेवटपर्यंत हेडऑन घेतील हे महत्त्वाचे असेल. काही लोक स्वतः थकतील किंवा काहींना सर्व प्रयत्न करून थकविले जाईल. तिघांची व्होटबँक एकत्र राहिली तर चमत्कार होऊ शकतो, पण ते वाटते तितके सोपे नाही. तीन पक्षांची मते एकमेकांना ट्रान्सफर होणे महत्त्वाचे आहे. पुण्याच्या कसब्यामध्ये ती झाली म्हणजे राज्यात सगळीकडे होतील असे गणित मांडणे चुकीचे आहे. राज्याचे काय घेऊन बसलात, दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या सुनेला उद्या भाजपने उमेदवारी दिली की, कालच्या निवडणुकीत होती त्यापेक्षा वेगळीच समीकरणे कसब्यात दिसतील.

काँग्रेस, राष्ट्रवादीची मते एकमेकांकडे ट्रान्सफर होणे कठीण नाही. कारण ते जुने भागीदार आहेत. प्रश्न ठाकरेंना मानणाऱ्या आणि वर्षानुवर्षे भाजपचे बोट धरून चालण्याची सवय असलेल्या मातोश्रीनिष्ठ मतदारांचा आहे. शिवसेनेतील फुटीमुळे या मतदारांचे विभाजन झाले असले तरी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेबद्दल कमालीचा राग असलेल्या मुस्लीम मतदारांमध्ये आश्चर्यकारकरीत्या प्रवेश केल्याचे दिसते. भाजप-मोदी नकोच असे वाटणारे मुस्लीम मतदार मोठ्या संख्येने आहेत. ते काँग्रेस-राष्ट्रवादीचे मतदार! उद्धव ठाकरे याच दोन पक्षांबरोबर असल्याने त्यांना जवळ करण्याकडे मुस्लीम मतदारांचा कल असू शकतो. फुटीमुळे वा मवाळ हिंदुत्वाच्या आरोपामुळे ठाकरेंच्या हातून एक विशिष्ट व्होटबँक गेली तरी त्याची भरपाई अशा पद्धतीने होऊ शकते.

शेर का मुकाबला ड्रॅगन से

भाजपविरोधातील पक्ष देशपातळीवर एका छताखाली नाहीत. ते भाजपच्या पथ्यावर पडते. महाराष्ट्रात मात्र उलटे चित्र आहे. इथले तिन्ही प्रमुख विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात भक्कमपणे एकवटले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती, शरद पवार यांचा मजबूत एकखांबी तंबू आणि अजूनही पाळेमुळे घट्ट असलेली काँग्रेस ही महाविकास आघाडीची बलस्थाने आहेत. तिन्ही पक्षांच्या ऐक्याने आघाडीला शेर बनविले असले तरी समोर ड्रॅगन उभा आहे. सामना ड्रॅगनशी आहे..

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार