खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 06:26 IST2026-05-05T06:25:26+5:302026-05-05T06:26:12+5:30
पाच विधानसभा निवडणुकांचे चित्र, हा मजकूर लिहीत असताना जवळपास स्पष्ट झाले आहे. तामिळनाडू वगळल्यास, निकाल अपेक्षेनुरूपच लागत आहेत.

खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
पाच विधानसभा निवडणुकांचे चित्र, हा मजकूर लिहीत असताना जवळपास स्पष्ट झाले आहे. तामिळनाडू वगळल्यास, निकाल अपेक्षेनुरूपच लागत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली असून, तामिळनाडूत चित्रपट अभिनेता विजय जोसेफ यांच्या तमिळग वेट्री कळगम (टीव्हीके) पक्षाने अनपेक्षितरीत्या सत्तेकडे झेप घेतली आहे. आसाम, केरळम आणि पुडूचेरीतील निकाल निवडणूकपूर्व अंदाजांनुसारच आहेत. बंगालमधील भाजपचा विजय ऐतिहासिक आहे. भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या या गृहराज्यात झेंडा फडकविण्याचे भाजपचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने २०११ मध्ये बंगालची सत्ता काबीज केल्यानंतर, गेली पंधरा वर्षे राज्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती; परंतु या निवडणुकीत ९२.४७ टक्के एवढे ऐतिहासिक मतदान झाले आणि तिथेच ममतादीदींची सद्दी संपत आल्याची पाल चुकचुकली!
मतदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर), बेकायदा घुसखोर, महिला सुरक्षा, बेरोजगारी, विकास, कायदा-सुव्यवस्था हे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे होते. ‘तृणमूल’ने ‘एसआयआर’चे भांडवल केले; पण त्यामुळे ध्रुवीकरण झाले आणि इतरही मुद्दे त्या पक्षाच्या विरोधात गेले, असे निकालांवर नजर टाकल्यावर म्हणता येते. भाजपने बंगालची सत्ता तर मिळवली; पण समोर ममतादीदींसारखी जमिनीशी नाळ जुळलेली, झुंजार, लढवय्यी नेता असताना, आपला ‘अजेंडा’ पुढे रेटणे भाजपसाठी सोपे नसेल. बंगालला ‘सोनार बांगला’ करण्याची आश्वासनपूर्ती करताना, पक्षाची कसोटी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत ‘तृणमूल’ने ‘खेला होबे’ हा नारा दिला होता. खेळ होईल, हा त्याचा शब्दश: अर्थ, तर आम्ही कडवी टक्कर देऊ, हा मतितार्थ! गेल्या निवडणुकीप्रमाणेच ‘तृणमूल’ने यावेळीही कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला; पण अखेर त्या पक्षाचाच ‘खेला होलो’ म्हणजे खेळ झाला! बंगालच्या सीमेवरील आसाममध्येही भाजपने मोठा विजय मिळवत सत्ता राखली आहे.
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी, घुसखोरी, नागरिकत्व, भूमिपुत्रांचे हित आणि विकास या मुद्यांवर राज्यात भाजपची पाळेमुळे घट्ट केली आहेत. आसाममधील भाजपच्या सातत्यपूर्ण यशामुळे प्रभावशाली नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक ठळक झाली आहे. ईशान्य भारतात भाजपचा विस्तार करण्यात आणि टिकवून ठेवण्यात त्यांचे योगदान मूल्यवान ठरत आहे. आसाममधील निकाल जेवढा अपेक्षित, तेवढाच तामिळनाडूतील निकाल अनपेक्षित! त्या राज्यात ‘टीव्हीके’ला बहुमताने थोडक्यात हुलकावणी दिली. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या आणि प्रथमच निवडणुकीला सामोरा गेलेल्या पक्षासाठी हे यश म्हणजे जणू सुखद स्वप्नच! ‘टीव्हीके’ला सरकार स्थापन करण्यासाठी कमी पडणार असलेल्या जागांची बेगमी छोटे पक्ष सहज करू शकतात; पण स्थिर, मजबूत सरकारसाठी विजय जोसेफ यांना द्रमुक किंवा अण्णाद्रमुकलाच सोबत घ्यावे लागेल. ‘थलपथी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय यांच्याकडून तामिळनाडूतील चित्रपटप्रेमी जनतेला आकाशाएवढ्या अपेक्षा आहेत; परंतु रुपेरी पडद्यावरील यश आणि प्रत्यक्ष प्रशासन यात मोठा फरक असतो. त्यांना त्वरित परिणाम दाखवावे लागतील. त्यामध्ये ते कितपत यशस्वी ठरतात, यावरच ते राजकारणात दीर्घ खेळी करू शकतील, की त्यांचा ‘चित्रपट’ लवकरच संपेल, हे ठरेल!
तामिळनाडूलगतच्या केरळममध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने मोठी आघाडी घेतली आहे. केरळममध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा असल्याने, गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटला यावेळी सत्ता गमवावी लागणे अपेक्षितच होते. सातत्याने अपयश चाखणाऱ्या काँग्रेसला केरळममधील यशाने थोडा दिलासा नक्कीच मिळेल. दक्षिणेतीलच पुडूचेरी या केंद्रशासित प्रदेशात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता राखली आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवता न आल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले होते; परंतु त्यानंतर महाराष्ट्र, बिहार, हरयाणा, दिल्ली आणि आता पश्चिम बंगाल, आसाम, पुडूचेरीतील निर्णायक विजयांनी ते मिटवले आहे. उत्तर व पश्चिम दिग्विजयानंतर बंगालमधील विजयामुळे भाजपचा पूर्व दिग्विजयही पूर्ण झाला आहे. आता त्या पक्षासाठी दक्षिण भारत हे एकमेव आव्हान शिल्लक आहे. हे निवडणूक निकाल म्हणजे केवळ राजकीय पक्षांचे जय-पराजय नाहीत. ते मतदाराच्या बदलत्या अपेक्षा-आकांक्षांचे आणि लोकशाहीच्या अखंड प्रवाहाचे द्योतक आहे. विजेते आणि पराभूतांनीही या कौलातून धडे घ्यावे! तोच लोकशाहीचा खरा संदेश आहे!