नकाणे रोडवरील साईबाबा नगरात राहणारे दूध व्यावसायिक मोहन अशोक गवळी यांच्या मालकीच्या तीन म्हशी बुधवारी सायंकाळी पावसात महिला वसतिगृहाच्या आवारातील मोकळ्या जागेत चरण्यासाठी आल्या होत्या़ याठिकाणी वादळी वाऱ्यामुळे रात्रीच्या सुमारास विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या़ त्यात विजेचा प्रवाह सुरू असल्याने म्हशींना त्या तारेचा स्पर्श होताच त्यांना जोरदार शॉक लागला़ यात तीनही दुभत्या म्हशी जागेवरच तडफडत मरण पावल्या़ यात दोन म्हशी तर गाभण होत्या़ तर एक पाच वर्ष वयाची मोठी म्हैस होती़ एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या या तीन म्हशी आहेत़
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक भगवान गवळी, अशोक गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ मोहन गवळी यांना धीर देत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले़ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली़ शिवाय तलाठीला बोलावून पंचनामाही करून घेण्यात आला़