सालगड्याचा पगार लाखावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:35 AM2021-04-11T04:35:29+5:302021-04-11T04:35:29+5:30
गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालदाराचा शोध घेत असतात. परंतु, यंदा शेतात काम करण्यासाठी सालदार एक ...
गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालदाराचा शोध घेत असतात. परंतु, यंदा शेतात काम करण्यासाठी सालदार एक लाख रुपयापेक्षाही जास्त रकमेची मागणी करीत असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील बहुतांश मजूर शेतात काम करण्यापेक्षा शहरात जाऊन कोणतेही काम केलेले बरे असे म्हणून शहराकडे कामासाठी निघून जात आहेत. त्यामुळे सालदार मिळणे कठीण झाले आहे. शेतीमध्ये सालदार मिळत नसल्याने व त्यांचे पगार लाखांच्यावर गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक कारणांमुळे शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने पगार देणे अवघड होऊन बसले आहे.
यंदा सालदारचा पगार कुठे ९० हजार तर कुठे १ लाखांवर गेल्याचे चित्र आहे. स्थानिक भागांमध्ये सालदार मिळत नसल्यामुळे परजिल्ह्यासह परराज्यातून (मध्य प्रदेश) येथून मजूर आणावे लागत आहेत. सहजासहजी सालदार मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने शेती करण्याला पसंती दिली आहे.
अनेक जण बैल मोडीत काढीत आहेत. शेती वाटणीने देण्याची पद्धत ही वाढली असून अर्धा हिस्सा अथवा तिसरा हिस्सा देऊन शेती केली जात आहे. त्यामुळे काम करणाऱ्यासोबत आपल्यालाही हिस्सा मिळत असल्याने संबंधित व्यक्ती चांगले कष्ट करून उत्पादनात वाढ करील आणि त्यातून आपल्याला हिस्सा मिळेल, या उद्देशाने शेती वाटणीने देण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे महागाई वाढत असल्याने सालगड्यांनाही आपल्याला मिळणारा पगार वाढवून द्यावा, अशी अपेक्षा वाटत आहे. शहरात गेल्यावर छोटी-मोठी कामे केली तर त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आपले कुटुंब बऱ्यापैकी चालते, म्हणून शहरात जाऊन कामे केलेली बरी असा मतप्रवाह मजुरांमध्ये दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी याचा चांगलाच धसका घेतला असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. एकीकडे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त जवळ आलेला असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे.
यांत्रिक शेतीवर भर - राज्य व केंद्र सरकारकडून शेती अवजारासाठी अनुदान मिळत असल्याने व मजुरांची उपलब्धता होत नसल्याने तालुक्यातील छोटे-मोठे शेतकरी यांत्रिक शेती करण्याकडे भर देत असल्याचे चित्र आहे. एकीकडे शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत आहेत. मात्र, दुसरीकडे सालगड्याची जीवनशैली बदलली असल्याने सालगडी ठरवणे व कराराप्रमाणे काम करून घेणे जिकिरीचे ठरत आहे. ग्रामीण भागातील तरुणांचे शिक्षण झाले आहे, असे म्हणत शेतीतील कामांना टाळत आहेत. मागील पिढीतील युवा शेतकरी काम करण्यास तयार होतात. परंतु, तेही रोजंदारी पद्धतीवर. याचा मोठा परिणाम बटाई(निम्मे) असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांवर होत असल्याचे चित्र आहे. लाख रुपये मोजनदेखील हवा तसा सालदार मिळत नसल्याची परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे.