उमरगा : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ‘आविष्कार’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त येथे आयोजित केलेल्या काव्यसंमेलनात सोमवारी सहभागी कवींनी सादर केलेल्या रचनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रमोद माने हे होते. याप्रसंगी पुष्पलता पांढरे यांनी आपल्या कवितेतून आईची कर्तबगारी व्यक्त केली. त्या म्हणाल्या,
‘ पिलांना देत असे बळ,
बळ जग जिंकण्याचे
होऊनी माय नी बाप’
राम पांचाळ यांनी,
‘इतिहासाच्या गाठी
पाठीवर टाकून
हे स्वातंत्र्य
गुमान फिरतय काय ?’
या ओळीतून स्वातंत्र्यात वारणाऱ्यांना सर्वांना प्रश्न केला.
हणमंत पडवळ यांनी
‘झुकतं माप दिलं तूला,
तूच मला झुकवलं’ या कवितेतून वृद्ध वडिलांची व्यथा व्यक्त केली.
श्याम नवले यांनी ‘पाऊस आला फिरूनी’ ही कविता सादर करून भावना मांडल्या. संजय धोंगडे यांनी ‘स्नेहाचा सागर, हृदयात ईश्वर’ या कवितेतून आईचं महत्त्व मांडले. सुनिता पोतदार यांनी ‘चंद्र’ कविता सादर केली. दिलीप चौधरी यांनीही कवितेतून शाळेविषयीच्या भावाना व्यक्त केल्या. याशिवाय, अनिल जाधव, रमेश ममाळे, बबिता महानूर, शशीकला राठोड, दयानंद पाटील, नागनाथ बदोले, प्रमोद माने आदींनीही वेगवेगळ्या विषयांवर कविता सादर केल्या. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कविसंमेलनाने साहित्य रसिक-श्रोत्यांना भरभरून आनंद दिला. सुधीर कांबळे बहारदार सूत्रसंचालन केले. गुणवत्ता कक्ष शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित या काव्यसंमेलनास मसाप उमरगा अध्यक्ष प्राचार्य डाॅ.दिलीप गरुड, मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, ‘आविष्कार’चे संपादक सुभाष वैरागकर, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, धनराज तेलंग, संजय रूपाजी, सदानंद कुंभार, अयोध्या चिगुरे, सरिता उपासे आदी उपस्थित होते. संमेलनासाठी बालाजी भोसले, प्रवीण स्वामी, रघुवीर आरणे, कमलाकर मोटे आदींनी पुढाकार घेतला.