महसूल, आपत्तीचे शर्थीचे प्रयत्न...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST2021-07-11T04:22:49+5:302021-07-11T04:22:49+5:30
डेअरिंग जीवावर बेततेय... पावसाळ्यात अनेक ठिकाणी कमी उंचीचे पूल असल्याने त्यावरून पाणी वाहते. मात्र, नागरिक गाव, घर जवळ करण्याच्या ...

महसूल, आपत्तीचे शर्थीचे प्रयत्न...
डेअरिंग जीवावर बेततेय...
पावसाळ्यात अनेक ठिकाणी कमी उंचीचे पूल असल्याने त्यावरून पाणी वाहते. मात्र, नागरिक गाव, घर जवळ करण्याच्या नादात प्रवाहाचा अंदाजच घेत नाहीत. पाण्याचा वेग, पुलाची स्थिती, त्यावरील खड्डे या बाबींमुळे वाहून जाण्याच्या घटना घडतात. यामुळे नागरिकांनी पुलावरून, रस्त्यावरून पाणी वाहत असताना त्यातून चालत किंवा वाहनावरून जाण्याचे धाडस करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लोकप्रतिनिधीही गेले धावून...
पाडोळी मंडळात झालेल्या दुर्घटनांची माहिती मिळाल्यानंतर खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच शेतीच्या नुकसानीची पाहणीही त्यांनी करीत प्रशासनास पंचनामे करण्याची सूचना केली. दरम्यान, आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही परिस्थितीची माहिती घेतली. भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या गावांना भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेतला.
शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव...
रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: पाडोळी मंडळात अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटले. ओढे, नाल्याचे पाणी शेतात शिरले. पिकांसह मातीही वाहून गेली. अजूनही अनेक ठिकाणी शेतीत पाणी थांबून आहे. या नुकसानीची माहिती देण्यासाठी समुद्रवाणी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. एकट्या या गावातील सुमारे ८५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी प्रशासनास कळविले आहे.
नुकसानीचे अहवाल तातडीने द्या : जिल्हाधिकारी
पावसामुळे काही ठिकाणी शेतीचे बरेचसे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळविली आहे. या ठिकाणच्या नुकसानीची पाहणी करून तातडीने अहवाल द्यावेत, असे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेल्या दोघांचा शोध बचावपथकांद्वारे घेण्यात येत आहे. शोधकार्य सुरू असताना नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. मात्र, या गर्दीत धक्का बसून किंवा अन्य कारणाने दुसरी दुर्घटना संभवते. त्यामुळे नागरिकांनी शोधकार्याच्या ठिकाणी किंवा पाण्याजवळ गर्दी करू नये.
- कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी