पाथरूड : महसूल विभागाने केलेल्या मध्यस्तीमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या शेतरस्त्याचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जाऊ लागले आहे.
भूम तालुक्यातील पाथरूड येथील आडसूळ यांच्या शेतातील गट क्रमांक ७७, ७८ येथील शेतरस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले हाेते. येथील जवळपास १० ते १५ शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अडचणी येत होत्या. यासाठी काही शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे शेतरस्त्याची मागणी केली. त्यानंतर पाथरूडचे तलाठी संकेत काळे यांनी ज्या सर्व्हे नंबरमधून रस्ता जाणार आहे, त्या सर्व शेतकऱ्यांशी बैठक घेतली. रस्त्यासाठी विरोध करणार्या शेतकऱ्यांशी समजूत काढून रस्त्याचा प्रश्न मिटवला. आणि १० एप्रिल रोजी आडसूळ यांच्या शेतातील दीड किलोमीटर लांब व १० फुट रुंद शेतरस्ता लोकसहभागातून करण्यात आला. यावेळी तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे, मंडळाधिकारी बी. बी. राऊत, तलाठी संकेत काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.