(फोटो : अजित चंदनशिवे १३)
अजित चंदनशिवे
तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पापनास तलावाच्या सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, अजूनही तलावाची बकाल स्थिती कायमच असून, येथील वाढलेले झाडे-झुडपे काढून बोटिंग करून पर्यटक, भाविकांना विरंगुळ्यासाठी तलाव खुला करावा, अशी मागणी पर्यटक, भाविक व शहरवासीयांमधून केली जात आहे.
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील पापनास हे तीर्थ क्षेत्राचे ठिकाण आहे. येथील तलावाचा विकास व्हावा यासाठी १९५० साली येथील भारत सेवक समाज संस्थेने जनावरांच्या पाण्यासाठी व पिण्यासाठी श्रमदानातून स्वतः तलाव खोदून पूर्ण केला होता. यानंतर प्रशासनाने काही काळ त्याची डागडुजी केली. तुळजापूर हे तीर्थ क्षेत्राचे ठिकाण असल्याने येथे येणारे भाविक पिकनिक स्पॉट म्हणून या तलावाकडे येतील, या उद्देशाने व शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या ३२५ कोटी रुपये निधीमधून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने पापनास तलावातील गाळ काढणे व सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. त्यावर जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करून गाळ काढून सभोवताली आकर्षक अशी दगडी भिंतही उभारण्यात आली. तसेच आतमध्ये पर्यटकांना आसन व्यवस्था, शौचालयगृह यासह अन्य कामेही करण्यात आली आहेत. असे असले तरी गेली पाच-सहा वर्षापासून तलावाचा दरवाजा नागरिक, भाविक व पर्यटकांसाठी बंदच आहे. सद्यस्थितीत तलावामध्ये बाभळीची झाडे-झुडपे तसेच शेवाळे वनस्पती वाढली आहे. तलाव सुस्थितीत राहावा यासाठी गेल्या काही वर्षात कुठलेच प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे तलावाच्या सुशोभीकरणावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात तर गेलाच, शिवाय त्याची बकाल अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
कोट.....
१९५० मध्ये भारत सेवक समाज संस्थेने श्रमदानातून पापनास तलावाची निर्मिती केली होती. यानंतर प्रशासनाने काही काळ त्याची देखभाल दुरुस्तीही केली. तुळजापूर विकास प्राधिकरणातून या तलावातील गाळ काढणे व सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. मात्र, तलावाची सद्यस्थिती पाहता यावर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये वाया गेल्याचे दिसत आहे. केलेले बांधकामदेखील पडण्याच्या स्थितीत आले आहे. प्रशासनाने अपूर्ण राहिलेले कामे लवकर पूर्णत्वास नेऊन हा तलाव खुला करावा.
- भाऊ भांजी, माजी नगरसेवक, तुळजापूर
काम पूर्ण झाल्यानंतरही तलाव का वापरात नाही, याबाबत मलाही काही माहिती नाही. मी येथे आल्यापासून तीन वेळा या तलावाची स्वच्छता करून घेतली. लॉकडाऊनच्या अगोदरदेखील स्वछता, डागडुजी करण्यात आली. मार्च २०२० मध्ये जिल्हाधिकारी आणि आमदार यांनी संयुक्त भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्या सूचनेनुसार तलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नंतर लॉकडाऊन लागल्याने ते सुरू होऊ शकले नाही. आता लॉकडाऊनचे नियम उठेपर्यंत ते सुरू करणे शक्य नाही.
- योगिता कोल्हे, तहसीलदार, तथा मंदिर व्यवस्थापक