तुळजापूर : राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे सर्वच विद्यार्थी ‘पास’ झाले. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने मात्र या न झालेल्या परीक्षेतही २५ विद्यार्थ्यांना दोन विषयांत अनुत्तीर्ण ठरविले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत विद्यापीठ परीक्षा नियंत्रकांना निवेदन पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे एप्रिल-मे २०२० मध्ये होणाऱ्या बी. कॉम. द्वितीय सत्राच्या विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तरीही या परीक्षेत बिझनेस मॅथेमॅटिक्स ॲण्ड स्टॅटिस्टिक्स (२) व आयटी ॲप्लिकेशन इन बिझनेस (२) या विषयांचा अनेक विद्यार्थ्यांचा निकाल अनुत्तीर्ण आला. म्हणजेच, ज्या परीक्षा झाल्याच नव्हत्या, त्या परीक्षेत अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण करण्यात आले, शिवाय, त्यांच्याकडून ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० च्या परीक्षेचे फॉर्मदेखील भरून घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. कोविडचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० च्या परीक्षा मार्च-एप्रिल २०२१ मध्ये ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. ही परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली व त्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील, याची त्यांना खात्री होती. मात्र, यातही हे विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले. यामुळे पुढील परीक्षेसाठी पुन्हा परीक्षा फी देऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.
ज्या परीक्षा विद्यापीठाने घेतल्याच नव्हत्या, त्या परीक्षेत विद्यार्थ्यांना दोन वेळा नापास ठरवून त्यांच्याकडून ३ वेळा परीक्षा फी भरून घेण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा, असे निवेदन या विद्यार्थ्यांनी दिले आहे. यावर रोहन पवार, सौरभ खांडेकर, शेख वसीम, रोहित गायकवाड, संजना गायकवाड, दुर्गा कदम यांच्यासह २५ विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.
130721\5818img-20210713-wa0012.jpg
तुळजापुर प्राचार्य यांना निवेदन देताना विद्यार्थी फोटो