Woman killed for eating a single mango : २९ वर्षे चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ४ आरोपींचा मृत्यूही झाला आहे.
एकच आंबा खाल्ल्याच्या वादातून महिलेची हत्या; ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा
संभल : जिल्ह्यातील आंबा खाण्याच्या वादातून महिलेचा खून केल्याप्रकरणी २९ वर्षांच्या सुनावणीनंतर जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी ३ आरोपींना जन्मठेपेची तर २ आरोपींना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. २९ वर्षे चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ४ आरोपींचा मृत्यूही झाला आहे.
एका आंब्यावरून वाद झाला आंब्याच्या बागेत अल्पवयीन मुलाने जमिनीवर पडलेला केवळ १ आंबा खाल्ल्याच्या वादातून महिलेचा खून करण्यात आला. हे प्रकरण संभल जिल्ह्यातील बनियाथेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमालपूर गावचे आहे. सरकारी वकील हरी ओम प्रकाश यांनी सांगितले की, १९९१ मध्ये जमालपूर गावात एका अल्पवयीन मुलाने आंब्याच्या बागेत जमिनीवर पडलेला आंबा खाल्ल्याने दोन गटामध्ये जोरदार भांडण झाले होते. यामध्ये एका बाजूने एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या मारामारी आणि भांडणात दुसऱ्या बाजूचे अनेकजण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही गटांच्या लोकांनी न्यायालयात एकमेकांविरुद्ध खटलाही दाखल केला होता. सुमारे २९ वर्षे न्यायालयात खटला सुरू होता.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने महिलेच्या हत्येप्रकरणी राम बहादूर, श्योराम आणि भुरा या तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर दुसरीकडे साबीर आणि निजामुद्दीन यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच २०-२० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आंबे खाणाऱ्या अल्पवयीन सूरजलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते, घटनेवेळी सूरज हा अल्पवयीन होता, त्यामुळे सूरजचे प्रकरण अद्याप बाल न्यायालयात प्रलंबित आहे. तर २९ वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका गटातील तीन आणि दुसऱ्या गटाच्या एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.
Web Title: Woman killed for eating a single mango; 3 sentenced to life imprisonment