डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 10:35 IST2026-04-14T10:34:24+5:302026-04-14T10:35:01+5:30
दुपारी साडेतीनच्या सुमारास सूरजकुमार फोनवर कोणाशी तरी वाद घालत रागाच्या भरात घराबाहेर पडला होता

डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
नाशिक - ठहर मै आता..इतना क्या काम है..सुबह से परेशान करके रखा है...असं म्हणून संतापातच घराबाहेर पडलेल्या ४० वर्षीय इसमाच्या मानेवर, डोक्यावर एका महिलेने कोयत्याने सपासप वार केले. त्यापूर्वी महिलेसह एकाने गंभीर जखमी असलेल्या या इसमांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. त्यामुळे तो अत्यवस्थ झाला अन् खाली कोसळला. याचा फायदा घेत महिलेने त्याच्यावर वार केले. तेव्हा काळ्या रंगाचा शर्ट घातलेला तरुण वार करत असताना उघड्या डोळ्यांनी पाहत होता.
सध्या या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या खुनाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारात कटारिया कंपनीसमोर ही घटना घडली. सूरज कुमार मोहनलाल सोलंकी असं या जखमी युवकाचे नाव आहे. त्याला मधुमेह असून त्याच्या पायाला गंभीर इजा झाल्याने पुढच्या २ दिवसांनी पायावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. सूरज हा मूळचा अहमदाबादचा रहिवासी असून सध्या तो नाशिकमध्ये स्थायिक होता.
द्वारकाजवळील ट्रॅक्टर हाउसजवळील घर बदलून तो त्याची वहिनी जुन्या नाशिकमधील नानावली येथे राहण्यास आले होते. तो वाडीवऱ्हे येथील पेलिकन कंपनीत कामाला होता. मागील काही काळापासून तो घरीच होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास सूरजकुमार फोनवर कोणाशी तरी वाद घालत रागाच्या भरात घराबाहेर पडला होता. त्यावेळी त्याची वहिनी मेघा गोपाळ सोलंकी यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकून न घेता निघून गेला. सुमारे तासभराने त्याचे दोन्ही मोबाइल बंद आढळले. या घटनेमागे कंपनीतील एक पुरुष आणि महिलेवर संशय व्यक्त केला जात आहे.
वहिनींकडे वास्तव्य
दरम्यान, सूरजकुमार याचे कंपनीतील काही व्यक्तींशी आर्थिक आणि वैयक्तिक वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी पोलिसांच्या अंदाजानुसार, प्रेम प्रकरणातूनही वाद होऊ शकतो. सूरज विवाहित असला तरी पत्नीपासून तो दहा वर्षापासून विभक्त होता. त्यामुळे तो नाशिकमध्ये वहिनींकडे उपचारासाठी आला अन् येथेच स्थायिक झाला.