भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 16:07 IST2026-04-29T16:04:31+5:302026-04-29T16:07:44+5:30
UP Crime News: पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटकेचे प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत.

भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
UP Crime News: उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. ग्राम प्रमुखाविरुद्ध भ्रष्टाचार आणि अनियमिततेबद्दल तक्रार केल्यानंतर एका कुटुंबाला मोठा धक्का बसला. असा आरोप आहे की, या तक्रारीमुळे संतप्त झालेल्या ग्राम प्रमुखाने आणि त्याच्या समर्थकांनी तक्रारदाराच्या भावावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटकेचे प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत.
तक्रारदाराच्या भावाला काठ्या, दांडक्यांनी मारहाण, कुठे घडला प्रकार?
ही घटना शिवगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिटौरा गावात घडली. भिटौरा गावातील रहिवासी बलवंत सिंग यांनी ग्राम प्रमुखाविरुद्ध अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत एक तक्रार दाखल केली होती. याबाबत चौकशी सुरू होती. त्यामुळेच असा आरोप आहे की, याच तक्रारीवरून ग्राम प्रमुख आणि त्यांच्या समर्थकांच्या मनात बलवंत सिंग यांच्या कुटुंबाबद्दल द्वेष निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी बलवंत सिंग यांचा भाऊ जसवंत सिंग शिवगड बाजारातून भाजीपाला घेऊन घरी परतत होता. तो गावाजवळ पोहोचताच, आधीच दबा धरून बसलेल्या ग्राम प्रमुखाने आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी काठ्या आणि दांडक्यांनी जसवंतला निर्घृणपणे मारहाण करून गंभीर जखमी केले.
उपचारादरम्यान झाला मृत्यू
हा हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच, कुटुंबीय घटनास्थळी धावून आले आणि गंभीर अवस्थेत असलेल्या जसवंत सिंग यांना लंभुआ येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) नेण्यात आले. तेथील डॉक्टरांना त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून त्यांना सुलतानपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. बुधवारी सकाळी उपचारादरम्यान जसवंत सिंग यांचे निधन झाले.
तक्रारदाराचे ग्राम प्रमुखावर गंभीर आरोप
मयताचा भाऊ बलवंत सिंग यांचा आरोप आहे की, ग्राम प्रमुखाविरुद्ध तक्रार दाखल केल्यामुळे त्यांच्या भावाला लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने हा हल्ला पूर्वनियोजित पद्धतीने केला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत, पीडित कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस पथके छापे टाकत असून आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुलतानपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) ब्रिज नारायण सिंह यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.