जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाची १० लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या; तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 06:23 IST2026-05-18T06:23:15+5:302026-05-18T06:23:29+5:30
गणेशपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून तपास सुरू केला.

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाची १० लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या; तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने गुंडांना सुपारी देऊन मोठ्या भावाची हत्या केली. या प्रकरणी गणेशपुरी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. शेडगाव येथे ४० वर्षीय व्यक्तीच्या हत्येची ही घटना १२ मे रोजी उघडकीस आली. गणेशपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथकही समांतर तपास करत होते.
शेडगाव गावातील परेश टोलाराम पाटील (४०) हा दुचाकीवरून वसई येथे कामावर जात असताना वाशिंद-अंबाडी रोड ते शेडगाव फाटा या दरम्यान अनोळखी व्यक्तीने डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली होती. याबाबत त्याचा भाऊ नरेश (३७) याने हत्येच्या गुन्ह्याची फिर्याद दिली होती.
२०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासत धडक कारवाई
गणेशपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून तपास सुरू केला.
या पथकाने २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या वाहनाचा क्रमांक मिळवून आरोपी राकेश पाटील, प्रेमजीत घरत, दक्षत भोईर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी हत्येची कबुली दिली. नरेशने मारण्याची सुपारी देऊन भावाला जीवे मारण्याचा कट रचला असल्याचे कबूल केल्याने या गुन्ह्यात चारही आरोपींना अटक केली.
सामायिक शेतजमीन हडपल्याचा राग
परेश व नरेश यांची सामायिक शेतजमीन परेशने स्वत:च्या नावे करून घेतली होती. तसेच घरही आपल्या नावे केले होते. या गोष्टीचा राग मनात धरून नरेश याने १० लाख रुपयांची आपल्या भावाच्या हत्येची सुपारी केळवा, पालघर येथील गुंडांना दिली होती.