व्हिसेराच्या बरण्या शवागारातच !

By Admin | Updated: September 5, 2014 00:57 IST2014-09-05T00:42:29+5:302014-09-05T00:57:20+5:30

लातूर : संशयित मृत्यू, खून व अन्य संशयास्पद प्रकरणांत मृत्यू झालेल्या मयतांच्या अंतरिक अवयवांचा भाग तपासणीसाठी घेतला जातो. मृत्यूचे निश्चित कारण शोधण्यासाठी हा व्हिसेरा तपासणीसाठी घेतला जातो.

Whistle berries in the grapefruit! | व्हिसेराच्या बरण्या शवागारातच !

व्हिसेराच्या बरण्या शवागारातच !


लातूर : संशयित मृत्यू, खून व अन्य संशयास्पद प्रकरणांत मृत्यू झालेल्या मयतांच्या अंतरिक अवयवांचा भाग तपासणीसाठी घेतला जातो. मृत्यूचे निश्चित कारण शोधण्यासाठी हा व्हिसेरा तपासणीसाठी घेतला जातो. व्हिसेरा घेतल्यानंतर तो तात्काळ संबंधित प्रयोगशाळेत जाणे गरजेचे असते. परंतु, लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयातील शवागारात व्हिसेराच्या बरण्या तशाच पडून राहतात. महिनोन् महिने तपासिक पोलिस अधिकारी त्याकडे साधे ढुंकूनही पाहत नाहीत. सध्याही सर्वोपचारच्या शवागारात व्हिसेरा घेतलेल्या ७० बरण्या पडून असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शवविच्छेदन झाल्यानंतर संशयास्पद मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अंतरिक अवयवांचे भाग (व्हिसेरा) पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. प्रकरण अतिसंवेदनशील असेल तरच पोलिस व्हिसेरा तात्काळ संबंधित प्रयोगशाळेकडे पाठवितात. परंतु, संशयास्पद मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा कोणी पाठपुरावा करणारा नसल्यास व्हिसेरा तात्काळ लॅबोरेटरीकडे जात नाही. पोलिसांचा हलगर्जीपणा असतो. त्यामुळेच लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात सध्याही व्हिसेरा (अंतरिक अवयव) घेतलेल्या ७० बरण्या पडून आहेत. रुग्णालय प्रशासनाने पोलिस अधिकाऱ्यांना वारंवार पत्र पाठवूनही व्हिसेरा तपासणीसाठी पाठविला जात नाही. त्यामुळे अनेक संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणांचा शोध पोलिसांना लागत नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे जिल्हा रुग्णालय हस्तांतरण होण्यापूर्वीचे काही व्हिसेराचे नमुने अद्यापही शवागारात पडून आहेत. जवळपास सात ते आठ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही या व्हिसेराची विल्हेवाट पोलिसांकडून लावलेली नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वोपचार रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सी.आर. दोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पोलिस त्यांच्या सोयीनुसार व्हिसेरा घेऊन जातात. सध्या शवागारात ७० च्या पुढे व्हिसेराच्या बरण्या आहेत. महिनोन् महिने त्या तशाच पडून असतात. वास्तविक पाहता तात्काळ त्या प्रयोगशाळेकडे पाठविणे गरजेचे आहे. जेणेकरून मृत्यूच्या कारणांचे शास्त्रीय उत्तर मिळू शकते. परंतु, त्या तात्काळ पाठविल्या जात नाहीत. वारंवार विनंतीवजा पत्र पाठवूनही पोलिस व्हिसेरा घेऊन जात नाहीत, असेही डॉ. दोडे म्हणाले. (प्रतिनिधी)
रासायनिक केमिकल मिसळून बरण्यामध्ये अंतरिक अवयव घेतले जातात. त्याची कालमर्यादा केमिकलमुळे अनेक वर्षे टिकून राहू शकते. परंतु, त्याची वेळेत तपासणी होणेही आवश्यक आहे. फॉरेन्सिक लॅबच्या चाचण्यानुसार मृत्यूचे कारण कळते, असेही डॉ. दोडे म्हणाले.
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तपासिक अधिकाऱ्यांनी तात्काळ व्हिसेरा घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविला पाहिजे. स्थानिक प्रकरणातील तपासिक अधिकाऱ्यांकडून व्हिसेरा घेऊन जाण्यास विलंब होत नाही. परंतु, शहराबाहेरील तपासिक अधिकाऱ्यांकडून विलंब होतो. लातूर शहरापासून लांब असलेल्या प्रकरणातच असा विलंब दिसतो. शहरातील एकही प्रकरण प्रलंबित नाही. पोलिस त्यांची जबाबदारी काटेकोरपणे पेलतात. त्यात कसलाही हलगर्जीपणा नाही. लांबठिकाणच्या तपासिक अधिकाऱ्यांकडून मात्र विलंब होतो, असे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रणझुंजारे यांनी सांगितले.

Web Title: Whistle berries in the grapefruit!