परंडा : शहरासह तालुक्यातील साठ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. अशा स्थितीत पिण्याच्या पाण्याचा अंतिम स्त्रोत म्हणून सीना-कोळेगाव प्रकल्पाकडे पाहिले जाते. त्यामुळेच प्रकल्पात असलेले पाणी राखीव ठेवण्याची आवश्यकता असताना प्रकल्प परिसरातील शेतकरी मोटारींद्वारे पाणी खेचत असल्याचे दिसून आले. परंडा शहराकडे पावसाने पाठ फिरविली आहे. जुलै महिना संपत आला तरी तालुक्यातील बहुतांश गावांत पावसाअभावी पेरण्याही झालेल्या नाहीत. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. शहरातील विंधन विहिरी दम तोडत आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी टँकरद्वारे भर पावसाळ्यात पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अशीच स्थिती राहिल्यास येणाऱ्या दिवसांत शहरासह तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न उग्र होणार आहे. परंड्याला पाणीपुरवठा करणारा खासापुरी प्रकल्प कोरडाठाक पडला असून, काही दिवसांनी शहराबरोबरच तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणा आहे. टँकरसाठीही पाणी मिळविताना प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पाण्याचा एकमेव स्त्रोत असलेल्या सीना-कोळेगाव प्रकल्पातही अत्यल्प साठा आहे. याच पाण्यावर परंडावासियांची मदार राहणार असल्याने उपलब्ध असलेले पाणी राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनीही निर्देश दिलेले असताना सीना-कोळेगाव प्रकल्प परिसरात काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू आहे. शुक्रवारी प्रकल्पस्थळी भेट दिली असता काही शेतकऱ्यांनी पाईपलाईन काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी पाईपलाईन सुरू असल्याचे दिसले. (वार्ताहर)वीस टँकरचा प्रस्तावशहरातील पाणीटंचाई लक्षात घेता टंचाई निधीतून अनुदान देण्याची मागणी नगराध्यक्षा राजश्री शिंदे यांनी केली आहे. टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता असून, यासाठी वीस टँकरच्या मागणीचा प्रस्ताव तहसील कार्यालयास दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने अनुदान उपलब्ध करून दिल्यास सीना-जॅकवेल परिसरातील विंधन विहिरी तसेच इतर जलस्त्रोतांचे अधिग्रहण करावे लागणार आहे. याबरोबरच सीना नदीपात्रात नव्याने खड्डे खोदून पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून घ्यावा लागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ९७ गावांसाठी पाणी टंचाईचा आराखडा तयारतालुक्यातील ९७ गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ८३ ठिकाणी विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव असून, १९ गावांकरिता २० टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज या आराखड्यात व्यक्त करण्यात आली आहे. सहा ठिकाणी नवीन विंधन विहिरी खोदणे प्रस्तावित असून, अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. उपसा थांबविण्याची मागणीसीना-कोळेगाव प्रकल्पात अत्यंत कमी पाणीसाठा आहे. टंचाई काळात हेच पाणी परंडावासियांना उपलब्ध करून देता येईल. त्यामुळे धरण परिसरातील पाण्याचा उपसा तातडीने थांबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
टंचाईतही पाणीउपसा सुरूच !
By admin | Updated: July 26, 2014 00:40 IST
परंडा : शहरासह तालुक्यातील साठ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. अशा स्थितीत पिण्याच्या पाण्याचा अंतिम स्त्रोत म्हणून सीना-कोळेगाव प्रकल्पाकडे पाहिले जाते.
टंचाईतही पाणीउपसा सुरूच !
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}