टोमॅटोने ओलांडली नव्वदी !

By Admin | Updated: July 28, 2014 00:57 IST2014-07-28T00:05:23+5:302014-07-28T00:57:05+5:30

उस्मानाबाद : जुलै महिनाही सरत आला असताना जिल्ह्यात एकही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे बाजारपेठेत टोमॅटोची आवक फारशी झालेली नाही.

Tomato crossed the ninth! | टोमॅटोने ओलांडली नव्वदी !

टोमॅटोने ओलांडली नव्वदी !

उस्मानाबाद : जुलै महिनाही सरत आला असताना जिल्ह्यात एकही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे बाजारपेठेत टोमॅटोची आवक फारशी झालेली नाही. परिणामी दर झपाट्याने वाढू लागले आहेत. रविवारच्या आठवडी बाजारात टोमॅटोने चक्क नव्वदी ओलांडली. तसेच अन्य भाज्यांचे दरही कडाडलेलेच आहेत.
अख्खा जून महिना संपल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्याची लागवड करता आली नाही. जुलै महिन्यामध्येही पेरणीयोग्यच पाऊस झाला. त्यामुळे सध्या बाजारपेठेमध्ये भाजीपाल्यांसोबतच टोमॅटो, बटाट्याची आवकही कमी प्रमाणात आहे. त्यामुळे याचे दर मोठ्या झपाट्याने वाढू लागले आहेत. येथील रविवारच्या आठवडी बाजारात टोमॅटोचा दर प्रतिकिलो ९० रुपये इतका होता. त्याचप्रमाणे बटाट्यांचा दरही ४० रुपयांवर जाऊन ठेपला होता. मागील काही दिवसांमध्ये कांद्याचे दर ३० ते ३५ रुपयांवर जाऊन ठेपले होते. मात्र आजच्या आठवडी बाजारात प्रतिकिलो २० रुपये कांदा मिळत होता.
भाज्यांच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. मेथीच्या एका जुडीसाठी १५ रुपये मोजावे लागले. तसेच पालक, कोथिंबिरीच्या जुडीसाठी प्रत्येकी १० रुपये लागत होते. (प्रतिनिधी)
गृहिणींचे बजेट कोलमडले
किराणा मालासोबतच आता भाजीपाल्याचेही दर कडाडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पूर्वी लहान कुटुंबाच्या आठवडी बाजारासाठी १५० ते २०० रुपये लागत असत. मात्र रविवारच्या बाजारात दुप्पट पैसे जाऊनही आठवडाभर पुरेल एवढा भाजीपाला आला नाही, असे अनेकांनी सांगितले.

Web Title: Tomato crossed the ninth!