जगण्याची नवी संधी! ‘आपल्या’ माणसांनी दरवाजे बंद केलेल्या वृद्धांना लाभला मायेचा ‘आधार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:25 IST2025-06-02T15:20:31+5:302025-06-02T15:25:01+5:30

विविध ठिकाणांहून आलेले वयोवृद्ध आज बीड बायपास येथील आधार वृद्धाश्रमाच्या छताखाली आपले उत्तर आयुष्य आनंदाने जगत आहेत.

The work was done and 'our' people closed the doors for the elderly; but Aadhar Vruddhashrma's support was received | जगण्याची नवी संधी! ‘आपल्या’ माणसांनी दरवाजे बंद केलेल्या वृद्धांना लाभला मायेचा ‘आधार’

जगण्याची नवी संधी! ‘आपल्या’ माणसांनी दरवाजे बंद केलेल्या वृद्धांना लाभला मायेचा ‘आधार’

- प्राची पाटील

छत्रपती संभाजीनगर : बहीण-भावंडांसाठी लग्न केले नाही. आज त्यांचे आयुष्य व्यवस्थित सुरू आहे. पण, प्रमिला आजी एकट्या पडल्या. आधार वृद्धाश्रमात त्या भेटल्या. याच आश्रमात जळगावचे ८० वर्षीय आजोबा, इंदू आजी, जालन्याच्या हिराबाई, गाण्याची आवड असणाऱ्या बेबी आजी, गतिमंद गरड आजोबा, असे अनेकजण भेटले. ज्यांचे कोणीही नाही, अशा निराधार वृद्धांचा, स्वतःच्या आई-वडिलांप्रमाणे मायेने सांभाळ करणारी संस्था म्हणजे आधार वृद्धाश्रम! संपूर्णपणे दात्यांच्या मदतीवर चालणाऱ्या या वृद्धाश्रमाचे चालक आहेत गणेश डोणगावकर. येथील वृद्धांच्या डोळ्यात समाधान जाणवते याचे श्रेय गणेश डोणगावकर यांचे आहे.

विविध ठिकाणांहून आलेले वयोवृद्ध आज बीड बायपास येथील आधार वृद्धाश्रमाच्या छताखाली आपले उत्तर आयुष्य आनंदाने जगत आहेत. प्रत्येकाच्या जीवनाची कहाणी वेदनादायी. रस्त्यावर दिवस काढण्यापेक्षा, नातेवाइकांची उपेक्षा झेलण्याऐवजी त्यांना हक्काचा मुलगा लाभला आहे. जळगावच्या आजोबांना ऐकायला कमी येते. मात्र, आवाज खणखणीत आहे. तुम्हाला मुलं वगैरे आहेत का, हा प्रश्न विचारताच, त्यांचे डोळे पाणावले. हातानेच कोणीच नाही अशी खूण त्यांनी केली. पण, आधारमध्ये अगदी समाधानाने जगत असल्याचे सांगितले.

वृद्धाश्रमास देणगीचा आधार
आजपर्यंत येथे १५० आजी-आजोबा वास्तव्यास राहून गेले. काही जणांना व त्यांच्या मुलांना समजावून सांगत घरी पाठवले. ज्यांचे वय झाले होते असे ४७ आजी-आजोबा याठिकाणी मृत्यू पावले. त्यांचे अंत्यविधी संस्थेने केले. हा सर्व गाडा लोक सहभागातून चालतो. संस्थेला कुठलेही शासकीय अनुदान नाही. सध्या येथे २६ वृद्ध आहेत. ज्यात १५ आजी, ११ आजोबा आहेत. यामधील काहीजण जागेवरून उठूसुद्धा शकत नाहीत. संस्थेतील तरुण कार्यकर्ता मारुती तुपसुंदर त्यांच्या अंघोळीपासून ते जेवणापर्यंत सर्व शुश्रूषा करतो. विद्या कुलकर्णी येथील स्वयंपाकघर सांभाळतात.

पुन्हा एकदा जगण्याची संधी
पोलिओग्रस्त राजेश यांना त्यांच्या भावाने ५ वर्षांपूर्वी शहरात सोडून दिले. १५ दिवस ते भाड्याच्या खोलीत एकटेच होते. पोटात अन्नाचा कण नसल्याने शरीराचा सापळा झाला. जागेवर मलमूत्र विसर्जनाने माशा घोंगावत होत्या. कोणीही त्यांच्या जवळ जायला तयार नव्हते. डोणगावकर यांना फोन आला अन् त्या ठिकाणी ते पोहोचले. स्वच्छता करून त्यांना आश्रमात आणले. ते जिवंत आहेत की मेले हे पाहायलाही आजवर कोणी आले नाही. राजेश यांच्याप्रमाणेच येथील प्रत्येकाची गोष्ट थोड्याफार फरकाने सारखीच आहे. आधार वृद्धाश्रमाच्या रूपात आयुष्याने त्यांना पुन्हा एकदा जगण्याची नवी संधी मिळाली.

असा झाला आरंभ
शहरात अनेक वृद्धाश्रम आहेत. पण, ज्यांना चालता-फिरता येत नाही, अशा आजी-आजोबांसाठी कुठलाच आश्रम नाही. २०१२ मध्ये घराजवळील एका वयोवृद्ध आजी आणि आजोबांची वाईट परिस्थिती पाहिली. त्यावेळेस विचार केला की, असे अनेक वयोवृद्ध शहरात आहेत. शेजारच्या त्या आजी-आजोबांना घेऊन आधार वृद्धाश्रमाची सुरुवात केली. स्वतःची जागा घेतल्यानंतर १०० आजी-आजोबांच्या राहण्याची व्यवस्था करता येईल.
- गणेश डोणगावकर, चालक, आधार वृद्धाश्रम

Web Title: The work was done and 'our' people closed the doors for the elderly; but Aadhar Vruddhashrma's support was received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.