शाळांत पुन्हा किलबिलाट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST2021-02-05T04:13:19+5:302021-02-05T04:13:19+5:30
औरंगाबाद: शहरात सहावी ते आठवी तर ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारी सुरू झाले. पालकांचे संमतीपत्र घेऊन विद्यार्थ्यांची ...

शाळांत पुन्हा किलबिलाट सुरू
औरंगाबाद: शहरात सहावी ते आठवी तर ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारी सुरू झाले. पालकांचे संमतीपत्र घेऊन विद्यार्थ्यांची तापमान तपासून शाळेत प्रवेश देण्यात आला. नव्या वर्गात गेल्यावर पहिल्यांदाच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण होते. तर पालकांना; मात्र स्कूलबस सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. तर पहिल्या दिवशी चाळीस ते पन्नास टक्के उपस्थिती शाळांत दिसून आली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग २१६८ शाळांत आहेत. त्यासाठी ७८०६ शिक्षक असून, त्यातील ७०७७ शिक्षकांनी आरटीपीसीआर तपासणी पूर्ण केली. तर ५९७२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २ शिक्षक पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या शाळांत २ लाख २० हजार ७८३ विद्यार्थी असून, ६२ हजार ५४४ पालकांनी संमतीपत्र दिले तर पहिल्या दिवशी २०१० शाळा सुरू झाल्या. त्यात ५५ हजार ९३९ विद्यार्थी उपस्थित राहिले. ही संख्या पुढील काही दिवसांत वाढेल, असे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल म्हणाले. दरम्यान, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी डॉ.बी. बी. चव्हाण तसेच शिक्षण उपनिरीक्षक रवींद्र वाणी यांनी घृष्णेश्वर विद्यालय, जि प शाळा कागजीपुरा, देवगिरी विद्यालय दौलताबाद या शाळांना भेटी दिल्या. तर मनपाचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे म्हणाले की, सहावी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. ५० टक्के विद्यार्थी पहिल्या दिवशी उपस्थित राहिले. निश्चित आकडा सांगता येणार नाही. तर चार तासिकांच्या शाळेसाठी विद्यार्थ्यांना डबे आणण्यास नकार देण्यात आला होता. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात शहरात शाळा भरल्या.
आता बरे वाटतेय
विद्यार्थी शाळेचा आत्मा आहे. शाळेच्या कर्मचार्यांनी विद्यार्थी शाळेत आल्यामुळे शाळेत जीव आल्याची भावना व्यक्त केली. वर्गात शिकवून आम्हालाही आनंद होतोय. विद्यार्थी पहिल्या दिवशी निम्मेच आलेत. एक बाकावर एक प्रमाणे बसवल्याने एका तुकडीचे दोन वर्ग करावे लागले. दहा महिन्यांनतर विद्यार्थ्यांत आल्याने आता बरे वाटतेय.
--उल्का पाठक, शिक्षिका
पाचवीचेही विद्यार्थी आले...
दुरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना ये-जा करण्याची सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थी इच्छुक असून येऊ शकले नाहीत. स्कूलबस सुरू झाल्यावर ही संख्या वाढेल. पाचवीचे विद्यार्थीही काही आले होते. त्यांना परत पाठवावे लागले. विद्यार्थ्यांचा किलबिलाट उत्साही करणारा आहे. ओस पडलेल्या शाळा पुन्हा जिवंत झाल्याची भावना आहे.
- विकास नागरे, शिक्षक.
शाळेतच मजा आहे
खूप दिवसांनी मित्र भेटले. शाळेत एकत्र भेटता आले. ऑनलाइनमध्ये शिकण्याचा कंटाळा आला होता. आता न समजलेलेही शिक्षकांकडून समजून घेता येईल. आता गृहपाठही रोज पूर्ण करावा लागेल; पण शाळेतच मजा आहे.
-राकेश राजपूत, विद्यार्थी.
लबसही सुरू व्हावी
घर, मोबाईल आणि व्हिडिओ काॅलला कंटाळले होते. मैत्रिणींनाही भेटायची इच्छा होती. वर्गात आज वर्षभरानंतर भेट झाली. आई बाबानांही कधी शाळा सुरू होईल, असे वाटत होते. शाळा सुरू झाली तशी स्कूलबसही सुरु व्हावी.
-सायली देवकर, विद्यार्थिनी
---
पहिल्या दिवशी उपस्थिती
६२,५४४
---
५९७२
शिक्षक
--
२१६८
शाळा सुरू
--
७०७७
शिक्षकांची चाचणी
--
२
पाॅझिटिव्ह शिक्षक