पोलीस भरतीच्या निकालात घोळ

By Admin | Updated: July 9, 2014 00:49 IST2014-07-09T00:46:16+5:302014-07-09T00:49:29+5:30

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली.

Police recruitment investigation | पोलीस भरतीच्या निकालात घोळ

पोलीस भरतीच्या निकालात घोळ

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालात काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तफावत झाली. हा घोळ लक्षात येताच सोमवारी जाहीर करण्यात आलेला निकाल तातडीने मागे घेण्यात आला. आता पुनर्परीक्षणानंतर बुधवारी (दि.९) सुधारित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ३८१ शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी १५ हजार ५९७ उमेदवारांनी अर्ज भरले होते. प्रत्यक्षात ११ हजार ५११ उमेदवार भरतीसाठी हजर राहिले.
त्यातील ४ हजार ३६४ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र ठरले. त्यातील ४ हजार १०३ जण लेखी परीक्षेस पात्र ठरले. या उमेदवारांची ६ जुलै रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला; परंतु गुणांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. काही उमेदवारांनी गुणात तफावत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यानंतर तपासणीत तांत्रिक बिघाडामुळे यादीतच घोळ झाल्याचे लक्षात आले आणि तातडीने हा निकाल मागे घेण्यात आला.
लगेच पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून सर्व उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीनंतर बुधवारी सुधारित निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Web Title: Police recruitment investigation