उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:58 IST2025-05-30T17:57:33+5:302025-05-30T17:58:33+5:30
कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी; पेरणीसाठी पैसे नाहीत; शेतकऱ्याने तहसीलदारांकडे मागितली आत्महत्येची परवानगी

उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
- सुनील घोडके
खुलताबाद : येथील एका शेतकऱ्याने पेरणीसाठी पैश्यांची तरतूद होत नसल्याने आत्महत्या करण्याची परवानगी तहसीलदार यांच्याकडे मागितली आहे. या निवेदनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
खुलताबाद येथील सुभाष आसाराम तंबारे या शेतकऱ्याने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात आपली व्यथा मांडली आहे. त्यांच्या मालकीची ०.४५ हेक्टर शेती गट क्रमांक ७/२ मध्ये आहे. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, खुलताबाद शाखेकडून चार वर्षांपूर्वी ५०,००० रुपये कर्ज घेतले होते, जे त्यांनी दोन वेळा नूतनीकरणही केले.
सध्याच्या (२०२४-२५) हंगामात त्यांनी अद्रक पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. ५ क्विंटल बी बियाणे त्यांनी १२,००० रु. प्रति क्विंटल दराने विकत घेतले. पिक चांगले आले असले तरी बाजारभाव अत्यल्प म्हणजे केवळ १,२०० रु. प्रति क्विंटल मिळाला. त्यामुळे २० क्विंटल मालासाठी त्यांना केवळ २४,००० रु. उत्पन्न मिळाले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, बियाणे, खते आणि इतर खर्चासाठी त्यांनी एकूण १,००,००० रु. इतका खर्च केला होता. अतिवृष्टी व पीक विम्याअंतर्गत त्यांना केवळ ७,००० रु. मदत मिळाली असून ती रक्कम त्यांच्या बचत खात्यावर जमा झाली आहे. परंतु स्टेट बँकेने त्यांनी घेतलेले जुने कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्या खात्यावर होल्ड ठेवले आहे आणि खात्यातील पैसे काढण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे पुढील पेरणीसाठी आवश्यक पैसा नसल्याने त्यांनी थेट तहसीलदार यांच्याकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे.