डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
By समीर देशपांडे | Updated: December 6, 2025 10:29 IST2025-12-06T10:27:04+5:302025-12-06T10:29:09+5:30
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी व सामाजिक न्यायासाठी जे काम केले तेच काम डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पातळीवर करत होते.

डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
समीर देशपांडे
कोल्हापूर : ‘संविधान’कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतच त्यांचा पुतळा कोल्हापूर शहरातील बिंदू चौकामध्ये उभारण्यात आला. पुरोगामी चळवळीतील तत्कालीन अग्रणी माधवराव बागल यांच्या पुढाकारातून जनतेच्या सहभागातून हा पुतळा उभारण्यात आला असून मंगळवार, दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी या पुतळ्याच्या उद्घाटनाला ७५ वर्षे पूर्ण हाेणार आहेत. येथील प्रसिद्ध शिल्पकार स्वर्गीय बाळ चव्हाण यांनी हा पुतळा तयार केला होता. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले. परंतु त्याआधीच सहा वर्षांपूर्वी त्यांचा पुतळा उभारून करवीरकरांनी त्यांना एक अनोखी मानवंदना दिली होती.
राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी व सामाजिक न्यायासाठी जे काम केले तेच काम डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पातळीवर करत होते. त्यामुळे आंबेडकर यांच्या हयातीतच त्यांचा पुतळा उभारून सन्मान करण्याची माधवराव बागल यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी पुतळा समिती स्थापन केली. बागल हेच या समितीचे अध्यक्ष होते. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण व्हावे, यासाठी हा पुतळा बिंदू चौकामध्येच उभारण्याचे ठरले. पुतळा उभारणीवेळीही काही सामाजिक, प्रशासकीय वाद निर्माण झाले. परंतु कोल्हापुरातील बहुजन समाज, कामगार संघटना आणि प्रगतशील मंडळींनी सामूहिक लढा उभारत प्रशासनाकडून पुतळा उभारणीची परवानगी मिळवली.
शिल्पकार बाळ चव्हाण यांची कारागिरी
राजाराम महाराजांच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या शंकर चव्हाण यांची चित्रकला आणि शिल्पकलेतील आवड पाहून प्रख्यात शिल्पकार करमरकर यांच्या सूचनेनुसार जे. जे. स्कूलला पाठविण्याचा निर्णय राजाराम महाराजांनी घेतला. चव्हाण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरला परत आले आणि आपले शिल्पकलेतील प्रावीण्य नंतरच्या अनेक वर्षांमध्यी सिद्ध करून दाखवले. त्यांच्याकडूनच डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बनवून घेण्याचे ठरले. त्यासाठी सलग पाच, सहा दिवस आंबेडकर चव्हाण यांच्यासमोर बसत होते, अशीही आठवण सांगण्यात येते.
७५ वर्षांपूर्वी उद्घाटन
ब्रांझमधील हा अर्धपुतळा चबुतऱ्यावर बसविण्यात आला असून ९ डिसेंबर १९५० रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हा द. मा. साळोखे हे कोल्हापूरचे नगराध्यक्ष होते तर व्ही. जी. चव्हाण हे सहायक होते. गेल्या ७५ वर्षांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती, पुण्यतिथीपासून ते सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमावेळी या पुतळ्याला अभिवादन करूनच कार्यक्रम सुरू करण्यात येतो. बिंदू चौकातील हा डॉ. आंबेडकर यांचा पुतळा त्यांच्या हयातीमधील जगातील पहिला पुतळा मानला जातो.