औरंगाबाद : चारित्र्यावर आरोप करुन सर्वांसमोर अपमानित केल्यामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यात लक्ष्मीबाई सुरेश बिपटे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी नामंजूर केला.
या संदर्भात मृत ज्योती प्रकाश वर्धे (४०) यांचे पती प्रकाश रंगनाथ वर्धे (४५, रा. बजाजनगर) यांनी फिर्याद दिली होती की, २२ डिसेंबर २०१८ रोजी त्यांची पत्नी ज्योती यांनी सांगितले की, बऱ्याच दिवसांपासून शेजारी राहणारी लक्ष्मीबाई सुरेश बिपटे (४२) ही त्रास देते. आज सुद्धा माझ्या चारित्र्यावर आरोप करुन सर्वांसमक्ष मला अपमानित केले. त्यावर फिर्यादीने ज्योती यांची समजूत काढली.
२४ डिसेंबर २०१८ रोजी ज्योती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीच्या मुलाने त्यांना फोनवरुन कळविले होते. यासंदर्भात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, लक्ष्मीबाई हिने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असता, न्यायालयाने तो फेटाळला. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी शासनातर्फे काम पाहिल. त्यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.