सारिका त्यांच्या दोन मुलांसह छावणी परिसरात राहतात. काही महिन्यांपासून जवळच राहणारे त्यांचे मेव्हणे अण्णा आल्हाट सारिका यांच्यावर वाईट नजर ठेवून होते व घर सोडून जाण्यासाठी त्यांना धमकावत होते. दि.७ ऑगस्ट रोजी सायंकाळी आल्हाट यांनी दारूच्या नशेत सारिका यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व त्यांचा विनयभंग केला. अण्णा, त्यांची पत्नी व मुलगा संदीप यांनी सारिका व त्यांच्या मुलांना जबर मारहाण केली. अण्णा यांनी सारिका यांच्या डोक्यात मोठा दगड मारून जिवे मारण्याची धमकी दिली.
तशाच अवस्थेत सारिका यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली; परंतु या घटनेला ४ महिने झाले. तरीही आरोपींवर कोणतीच कारवाई झालेली नाही. याउलट आल्हाट यांनी सारिका यांच्या विरोधात तक्रार केली. यावर फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. म्हणून वरील प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींवर कडक कार्यवाही करावी व सारिका यांंना न्याय द्यावा, अशी मागणी भारतीय महिला फेडरेशनने केली आहे. यावेळी संघटनेच्या जिल्हासचिव वसुधा कल्याणकर, जिल्हाध्यक्ष तारा बनसोडे, राज्य कौन्सिल सदस्य मनीषा बागूल, ॲड. नीता शिंगणे व सरस्वती इंगोले यांची उपस्थिती होती.