योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार
By Admin | Updated: July 31, 2014 00:45 IST2014-07-31T00:23:18+5:302014-07-31T00:45:05+5:30
उस्मानाबाद : कृषी व संलग्न विविध योजनांचा एकत्रित लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे,

योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार
उस्मानाबाद : कृषी व संलग्न विविध योजनांचा एकत्रित लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, यासाठी या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार बुधवारी झालेल्या कृषिमित्र आणि कृषिसहायकांच्या कार्यशाळेत करण्यात आला.
कृषी व पणन विभागाच्या वतीने बुधवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला आत्माचे विभागीय उपसंचालक संतोष आळसे, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी अशोक किरनळ्ळी, प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. डी. ए. हाके, तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. टाकनखार, डॉ. राज पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी विविध विभागाच्या प्रमुखांनी त्यांच्या यंत्रणेचे कार्य तसेच संबंधित विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. कृषी विस्तार कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे व त्यासाठी सकारात्मक पद्धतीने प्रयत्न करणे, एवढे असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. कृषी योजनांसह आत्मा, दुग्धविकास, कृषियांत्रिकीकरण, मत्स्य व्यवसाय, रेशीम उद्योग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदीच्या योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)
आदर्श शेतीसाठी नियोजन हवे..
भारत कृषिप्रधान देश असून, येथे शेती विकास पद्धती विकसित करण्याचे कार्य शेतकऱ्यांकडून होणे अपेक्षित आहे. कृषिमित्रांच्या मनुष्यबळाचा वापर करून घेतल्यास तसेच योग्य नियोजन केल्यास आदर्श शेती करता येते, असे उपसंचालक संतोष आळसे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पुरुष व महिला गटाची स्थापना करून अडचणी मांडण्यासाठी सामूहिकपणे पुढे आले पाहिजे, याबरोबरच शेतीतील चांगल्या उपक्रमांची माहिती घेण्यासाठी संयुक्त अभ्यास दौऱ्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पीकविमा, शेतकरी जनता अपघात विमा, खरीप हंगाम धोरण या संकल्पनेवर आधारित विकास योजना तसेच कमी पाण्यावर जास्त उत्पादन घेण्यासाठी उत्पादक व ग्राहक धोरण याबरोबरच शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे यासह विविध योजना राबविण्यात येतात, याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याची आवश्यकता असल्याचे कृषी अधिकारी अशोक किरनळ्ळी यांनी सांगितले. राष्ट्रीय गळीत धान्य तेलताडा अभियान, कोरडवाहू शेती अभियान आदींची यावेळी उपस्थितांना माहिती दिली.
जमिनीच्या आरोग्याची काळजी घ्या..
एकात्मिक अन्न-द्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. टाकणकर यांनी व्यक्त केली. शेती करताना जमिनीतील कस व पोत कमी होऊ नये, यासाठी शेणखत, गांडूळखत तसेच सेंद्रियखताचा वापर वाढविल्यास पीक उत्पादकता वाढते, असे सांगून चुनखडीयुक्त जमिनीचे अन्न द्रव्य व्यवस्थापन करताना त्यातील घटकांचे परीक्षण करा. शेतीतील खतांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रतिएकरी आठ किलो गंधकाचा वापर करा, असेही त्यांनी सांगितले.